औरंगाबाद : चंपाषष्ठीनिमित्त सातारा येथील खंडोबा मंदिरात यात्रेला सुरुवात झाली. सकाळी आरती व मूर्तीच्या लघुुरुद्राभिषेकास आबालवृद्धांनी गर्दी केली. वांग्याचे भरीत व बाजरीच्या भाकरीचा प्रसाद वाटला जात होता. ‘वाघ्या-मुरळी’चा डफ अन् तुणतुण्याची तार छेडीत खंडेरायाच्या नामाचा गजर सुरू होता. ‘जय मल्हार’ व ‘येळकोट येळकोट’च्या गजराने सातारा परिसर भक्तिमय झाला होता. परिसरात संसारोपयोगी साहित्याची दुकाने, खेळाचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. सकाळी आरतीनंतर सवाद्य छबिना मिरवणूक काढून व खंडोबाची पालखी निघाली. ती जहागीरदारांच्या वाड्यात पारंपरिकरीत्या दाखल होऊन तेथे लघुरुद्राभिषेक करण्यात आला. मंदिर व वाड्यात दिवसभर भक्तांची गर्दी होती. मिरवणुकीने रात्री ८.३० वा. मंदिरात मूळस्थानी मूर्ती विराजमान करण्यात आली. सकाळी चंपाषष्ठीच्या आरतीला सकाळी ७ वाजता लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव पळसकर यांनी केले. बससेवा आणि आरोग्य वाऱ्यावरच सातारा येथील खंडोबाच्या यात्रेत शहरातून बससेवा सोडण्यात आली नसल्याची खंत ट्रस्टी व ग्रामस्थांसह भाविकांनी व्यक्त केली. आरोग्य पथक काही काळ थांबून निघून गेले. यात्रेत पथकाची नियमित ड्यूटी लावावी, असे विश्वस्तांचे म्हणणे आहे. पाणी व सफाईवर लक्ष मंदिरात मनपा तसेच ट्रस्टच्या वतीने पाणी व सफाईवर लक्ष देण्यात आले. कारण भाविकांनी आणलेला प्रसाद तसेच हार, भंडारा, रेवडी इत्यादीसह परिसरात नारळाच्या कवट्या अन् इतर निर्माल्याची सफाई करण्यावर भर दिला होता. सीसीटीव्हीच्या साहाय्याने परिसरावर लक्ष ठेवण्यात येत होते. महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांगा करण्यात आल्याने दर्शनातील विलंब आणि गोंधळाला आळा बसला. काळे व रामराव पळसकर यांनी वांग्याचे भरीत, कांद्याच्या पाथीसह बाजरीच्या भाकरीचा प्रसाद वाटला.
खंडोबा यात्रेस सुरुवात
By admin | Updated: December 18, 2015 00:19 IST