तुकाराम नाईकवाडे, ताडकळसपरिसरामध्ये सध्या संकटाचे वातावरण आहे़ पाऊस नसल्याने शेतकरी त्रस्त असतानाच त्यातच केबीसी कंपनीमध्ये झालेल्या फसवणुकीमुळे या परिसरात नागरिक हैराण झाले आहेत़ एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे फसवणूक अशा दुहेरी संकटात नागरिक सापडलेले आहेत़ अल्पमुदतीत दुप्पट आणि तीनपट रक्कम देण्याचे आमिष दाखवत केबीसी कंपनीने ताडकळस आणि परिसरातही पाळेमुळे रोवले होते़ अनेक नागरिकांनी मोठा आर्थिक फायदा होईल, या लालसेने या कंपनीत गुंतवणूक केली़ फुलकळस, देऊळगाव, देवठाणा या भागातही गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे़ ताडकळस व परिसरात साधारणत: दोन ते तीन कोटी रुपये कंपनीमध्ये गुंतले असल्याची चर्चा आहे़ एवढी मोठी रक्कम या भागातून गुंतविण्यात आली आणि आता मात्र कंपनीने गाशा गुंडाळल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत़ या भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे़ या व्यवसायावरच नागरिकांनी जमा केलेली पुंजी कंपनीच्या हवाली केली होती़ गुंतवलेले पैसे देखील मिळाले नाहीत आणि दुसरीकडे पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ शेतात पेरण्या झाल्या नाहीत़ बी-बियाणे खरेदीसाठी पैसे गुंतले आहेत़ पेरले नाही तर उत्पन्न मिळणार नाही़ पेरणीचा कालावधी उलटून जात आहे़ जुलै महिना संपत आला तरीही पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल आहे़ एकंदर केबीसी आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटात येथील नागरिक अकडला आहे़
केबीसी आणि दुष्काळ
By admin | Updated: July 24, 2014 00:23 IST