कोळनूर : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जळकोट तालुक्यातील करंजी येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे़ शिवकांत रामराव टाकळे (३५, रा़ करंजी, ता़ जळकोट) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे़ करंजी येथील शिवकांत टाकळे यांना ११ गुंठे जमीन आहे़ कुटुंबाचा उदरनिर्वाह एवढ्या शेतीवर भागत नसल्याने त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जळकोट शाखेकडून ५० हजार रूपयांचे कर्ज घेऊन छोटेसे किराणा दुकान सुरू केले होते़ यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून काहीही उत्पन्न निघाले नाही़ तसेच दुकानही चालत नसल्याने ते चिंताग्रस्त होते़ यातूनच त्यांनी शनिवारी पहाटे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, भाऊ, बहिण असा परिवार आहे़ घटनास्थळास जळकोट पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला़ अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंडित सिरसे, पोहेकॉ़ चव्हाण, पोहेकॉ जाधव करीत आहेत़
कर्जबाजारीपणामुळे करंजीत शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: April 16, 2016 23:45 IST