- यादवकुमार शिंदे
सोयगाव : संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या ४ फळपिकांचा विमा काढण्यासाठी राज्य सरकारकडून फक्त ३१ तासांचा वेळ देण्यात आल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यानुषंगाने शासनाने पीकविमा योजना लागू केली असली तरी लालफितीच्या नोकरशाहीमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडत आहे. फळपिकांचा विमा काढण्यासाठीचे राज्याच्या कृषी आयुक्तांनी १३ जून रोजी सायंकाळी ५:०० वाजता सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. त्यात फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करावी, असे सांगितले. तसेच संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या चार पिकांचा विमा काढण्याची अखेरची मुदत १४ जून रोजी रात्री १२:०० वाजेच्या आत दिली. त्यामुळे ३१ तासांमध्ये या फळपिकांचा संबंधित शेतकऱ्यांनी विमा कसा काढावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. यातच अनेक शेतकऱ्यांना या फळपिकांचा विमा काढता आला नाही. याबाबत तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्य शासनाने यंदा आठ फळपिकांसाठी विमा योजना राबवली आहे. शनिवारी दिवसभर शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत; परंतु, काही पिकांना एक दिवसाचाच वेळ मिळाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारला मुदत वाढविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या चारही फळपिकांसाठी मुदत वाढून मिळण्याची शक्यता आहे.
कोणती कागदपत्रे आवश्यक ?योजनेसाठी अर्ज करताना ॲग्रिस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन उतारा, जिओ टॅग फोटो, ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्रे ३१ तासांत जमवणे, या योजनेची माहिती घेणे आणि पैशांची तजवीज करून अर्ज करणे शक्य आहे का? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शिवाय एकाच दिवशी एकाच वेबसाइटवर राज्यातील सर्व शेतकरी अर्ज करू लागले तर विमा पोर्टल सुरळीत चालणार का, असा प्रश्न निर्माण होतो. १४ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विमा पोर्टल वेबसाइटला एरर येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे घाईत तयारी केलेल्या शेतकऱ्यांनाही या फळपिकांचा विमा काढता आला नाही.
अन्य कोणत्या पिकांना किती मुदत ?चिकू, मोसंबी पिकांसाठी ३० जून, डाळिंब पिकासाठी १४ जुलै, तर सीताफळ पिकाचा विमा काढण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
विम्याची मुदत वाढेलफळबाग पीक विमा योजनेंतील लिंबू, पेरू, द्राक्ष आणि संत्रा या पिकांचा विमा काढण्यासाठी १३ जून रोजी संकेतस्थळ सुरू झाले आणि १४ जूनपर्यंत विमा काढण्यास मुदत होती. ही बाब कृषी आयुक्तालयांस कळविली आहे. या फळपिकांच्या विम्याची मुदत नक्की वाढेल.-प्रकाश देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक