हिंगोली : एचआयव्ही संसर्गित जिल्ह्यामध्ये ० ते १४ वयोगटातील जवळपास १३२ बालके आहेत. त्यापैकी अनेकांना आईवडील नसल्याने त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही बालके नातेवाईकांकडे राहतात. त्यांची हेळसांड होणार नाही, याची काळजी घेत शासनाकडून त्यांना हक्काचे वसतिगृह असणे आवश्यक आहे.जिल्हा आरोग्य विभागामार्फत एचआयव्हीचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरी व ग्राम स्तरावर विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत. बाधितांना आवश्यक उपचार पद्धती दिली जात आहे. गतवर्षी जिल्ह्याचे बाधितांचे प्रमाण १.८ टक्के एवढे होते. जनजागृतीनंतर यावर्षी ते ०.७१ टक्के झाले आहे. असे असले तरी एचआयव्ही संसर्गित अनाथ बालकांसाठी वसतिगृह आवश्यक आहे. जेणेकरून त्यांची हेळसांड होणार नाही, परंतु याबाबत शासनाकडून काही हालचाली होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना हक्काचे वसतिगृह नसल्याने ते इतर नातेवाईकांकडे राहतात. आजही समाजामध्ये काही ठिकाणी संसर्गित बालके आणि सामान्य बालकांत भेदभाव केला जातो. तो करू नये, यासाठी होणारी जागृती मानसिक कसोटीवर टिकत नाही. त्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था असल्यास ते फायद्याचे ठरू शकते. जिल्ह्यात एकूण ७१ अनाथ संसर्गित मुले आहेत. त्यापैकी अनेक पूर्णत: अनाथ आहेत. त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एचआयव्हीबाबत तसेच बाधित व्यक्तींना माहिती व समुपदेशन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण ७ आयसीटीसी केंद्र आहेत. तसेच उपजिल्हा रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत उपचार व मार्गदर्शन केले जाते. (प्रतिनिधी)
एचआयव्हीबाधित बालक वसतिगृहाविना
By admin | Updated: January 13, 2016 23:58 IST