लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गुरुवारी दुपारनंतर पावसाच्या सरीवर सरी कोसळत राहिल्या. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहिले, तर अनेक भागांत पिकांमध्ये पाणी साचले. जालना शहराला पाणीपुरवठा करणा-या घाणेवाडी जलाशाची पाणीपातळी १६ फुटांवर पोहचली असून, शहरातील मोती तलाव व मुक्तेश्वर तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. भोकरदन, बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली, तर परतूर व मंठा तालुक्यात पावसाने दुस-या दिवशीही हजेरी लावली.शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.दुपारी एकच्या सुमारास सुरू झालेली पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अधूनमधून पावसाचा जोर वाढल्याने शहरातील रस्त्यावर पाणी साचले. जुना जालन्यातील बाजार गल्लीत गुडघ्यापर्र्यंत पाणी साचल्याने ग्राहक व विक्रेत्यांची तारांबळ उडाली. सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली. अंतर्गत भागातील रस्ते जलमय झाले होते. ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांची पावसामुळे धावपळ झाली.तालुक्यातील रामनगर, विरेगाव, माळशेंद्रा, वंजारउम्रद, गोंदेगाव, घाणेवाडी, निधोना, जामवाडी, पानशेंद्रा परिसरातही पावसाने हजेरी लावली.भोकरदन तालुक्यातील केदरखेडा, वालसावंगी, पारध, हसनाबाद परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. सोयाबीन काढणीसह मिरची तोडण्याची कामे पावसामुळे ठप्प आहेत. अंबड तालुक्यातही सर्वदूर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वडीगोद्री शिवारात पावसाचा जोर अधिक होता. बदनापूर तालुक्यातील बहुतांश गावात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परतूर व मंठा तालुक्यात पावसाने दुसºया दिवशीही हजेरी लावली.
दिवसभर ‘कोसळधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:14 AM