औरंगाबाद : दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत शासनाने महापालिकेला ७ कोटी ५० लाख रुपयांचा घसघशीत निधी उपलब्ध करून दिला. यातील सुमारे ३ कोटी रुपये एकाच वॉर्डाला देण्यात आल्याची धक्कादायक बाब आज सर्वसाधारण सभेत समोर आली. या निधीचे समान वाटप करून इतर वसाहतींनाही न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले.दरवर्षी शासनाकडून दलीत वस्ती सुधार योजनेत निधी प्राप्त होतो. यंदा मनपाने विविध वसाहतींसाठी २४ कोटी रुपयांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केली होती. शासनाकडून शहरासाठी फक्त ७ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले. यातील ३ कोटी रुपये वॉर्ड क्र. १३ भीमनगर-भावसिंगपुरा येथे देण्यात येत असल्याचे मनपाला कळविण्यात आले. इतर वॉर्डांना अत्यंत तुटपुंजा स्वरूपात निधी देण्यात आला. नगरसेविका ज्योती अभंग यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत हा मुद्या उपस्थित केला. शासनाचा निधी प्रत्येक वॉर्डाला दिला पाहिजे. एकाच वॉर्डाला जास्त निधी देण्यामागे कोणता हेतू आहे.
दलित वस्तीच्या निधीवरून खडाजंगी
By admin | Updated: April 21, 2016 00:43 IST