लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : समशेर खान यांच्या मृत्यू प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक एम.ए. रौफ यांना गुरुवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास रौफ यांना न्यायालयात आणले होते.संगमनेर येथील वाहन चोरी प्रकरणात १९ डिसेंबर रोजी समशेर खान शामेर खान यास नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी समशेर खान यास मारहाण झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एम.ए. रौफ, जमादार तुळसीदास देशमुख आणि शेख मुश्ताक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एम.ए. रौफ यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर २० सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. न्यायालयाने हा जामीन फेटाळून, रौफ यांना पोलिसांच्या स्वाधिन होण्याचे आदेश दिले. त्यानंतर रौफ यांना औरंगाबाद येथे अटक झाली होती.दरम्यान, गुरुवारी एम.ए. रौफ यांना न्यायालयासमोर उभे केले जाणार होते. दुपारी ३ वाजेपासून या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पहावयास मिळाला. शहराचे पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा यावेळी लावला होता.न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा बंदोबस्त लावला असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूने असलेल्या छोट्या रस्त्याने रौफ यांना न्यायालयात आणण्यात आले. सी.आय.डी.चे उपअधीक्षक सुधाकर सुरडकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. न्या.एन.एन. कुलकर्णी यांच्या न्यायालयासमोर त्यांना उभे करण्यात आले.त्यावेळी न्या.कुलकर्णी यांनी रौफ यांना २५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील अॅड.डी.एन. डाखोरे यांनी सरकारची बाजू मांडली.
रौफ यांना चार दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:20 IST