माजलगाव : तालुक्यातील गोविंदवाडीचा वीजपुरवठा मागील महिनाभरापासून खंडित आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने येथील ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी अनेकेवळा निवेदने दिली, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. शेवटी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर महावितरणच्या विरोधात उपोषण सुरू केले.गोविंदवाडी येथे ४ जून रोजी वादळी वाऱ्यामुळे अनेक विद्युत खांब पडले होते. अनेक ठिकाणच्या ताराही तुटल्या होत्या. याकडे मात्र महावितरणने अद्यापही लक्ष दिलेले नाही. एक महिन्याचा कालावधी उलटूनही महावितरणने वीजपुरवठा सुरळीत न केल्याने गोविंदवाडीच्या संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या वीजपुरवठ्या संदर्भात त्यांनी अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतातील पिकांचाही प्रश्न गंभीर बनला होता. सोमवारी या उपोषणाला सुरुवात केली असून, सूर्यकांत दराडे, उद्धव जाधव, पांडुरंग तांदळे, दशरथ जाधवर, श्रीहरी चौधरी, नवनाथ जाधवर, सुदाम बडे, शिवाजी मुंडे, भारत काळे, रामेश्वर दराडे आदींची उपस्थिती आहे. वीज सुरळीत करेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला. (वार्ताहर)
महावितरणच्या विरोधात उपोषण
By admin | Updated: July 15, 2014 00:50 IST