लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के उपयुक्त जलसाठा आहे, तर ६४ पैकी ३८ प्रकल्प अद्याप जोत्याखाली असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सात मध्यम तर ५७ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता २७३.२५ दलघमी आहे. या आठवड्यातील अहवालानुसार मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ २५.७१ दलघमी जलसाठा आहे. यातील उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी १०.८२ टक्के एवढा आहे. कल्याण गिरजा, कल्याण, अप्पर दुधना, जुई, धामणा, जीवरेखा, गल्हाटी या मध्यम प्रकल्पांमध्ये २४. ७३ टक्के जलसाठा आहे. वाकी, दरेगाव, जामवाडी, निरखेड तांडा, वानडगाव, पिंपळवाडी, कुंभेफळ, सोमठाणा, बरंजळा, प्रल्हादपूर, पिंपळगाव कोलते, चांदईएक्को,पळसखेडा, बानेगाव, चिंचखेडा, डोलखेडा, डावरगाव, कानडगाव, भातखेडा, सुखापुरी, धनगरपिंप्री, खडकेश्वर, टाक, लासुरा, पाणेगाव, तळेगाव, मुसा भद्रायणी दहेगाव, जांबसमर्थ इ. लघु प्रकल्प अद्याप जोत्याखाली आहेत. तर सारवाडी व नेर प्रकल्प पूर्णत: कोरडा आहे. मोठ्या सात प्रकल्पांपैकी तीन तर ५७ लघु प्रकल्पांमधील ५२ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उपलब्ध आहे. जालना जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी ६८८ मिलीमीटर असून, आतापर्यंत केवळ २१०. २७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्यामुळे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. याचा पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला. मात्र, यंदा जिल्ह्यात अद्यापही सर्वदूर दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरींना अद्यापही पाणी आलेले नाही. पिकांची स्थिती नाजूक असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यातील प्रकल्पांत अकरा टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:46 IST