घटना : एक औरंगाबादचा, दुसरा कोपरगावचा
वैजापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली. यातील एका तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी तालुक्यातील सुराळा शिवारात सापडला, तर दुसरा तरुण अजूनही बेपत्ता आहे.लक्ष्मण नामदेव गाडीवान (१९, रा. तळेगाव, ता. कोपरगाव) असे मृत युवकाचे नाव असून, अद्याप शोध न लागलेल्या तरुणाचे नाव अक्षय कर्डिले (रा. औरंगाबाद) असे आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील तळेगाव येथील लक्ष्मण गाडीवान हा युवक तळेगाव शिवारातील नांदूर-मधमेश्वर कालव्यात २९ रोजी अंघोळीसाठी गेला होता. त्याचा तोल गेल्याने तो घसरून पडला व कालव्यात वाहून गेला. ३0 ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी ७ वाजता तालुक्यातील सुराळा शिवारात त्याचा मृतदेह सापडला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसर्या एका घटनेत औरंगाबाद येथील अक्षय कर्डिले हा तरुण त्याच्या जोडीदारासह शिर्डी येथे गेला होता. येताना बेलगाव शिवारातील नांदूर-मधमेश्वर कालव्याजवळ हात-पाय धुण्यासाठी थांबले होते. यातील एका तरुणाचा तोल गेल्याने तो कालव्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी अक्षय कर्डिले याने प्रयत्न केला; परंतू या घटनेत तोच कालव्यात वाहून गेला. रविवारी ३.३0 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तो वाहून गेल्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अक्षयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु रात्री उशिरापर्यंत त्याचा तपास लागला नाही