लातूर : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी केलेला खर्च ३० दिवसांच्या आत सादर न केल्यामुळे जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी ही कारवाई केली असून, एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या निवडणूकीतील खर्चाचा तपशील या सदस्यांनी सादरच केलेला नव्हता़ त्यामुळे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे़ निवडणूक झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक विभागात सादर करणे बंधनकारक आहे़ मात्र निवडूण आल्यानंतरही जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायत सदस्यांनी खर्च सादर केला नाही़ या प्रकरणी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी तीन वेळा सुनावणी घेतली़ सुनावणीदरम्यान निवडणूकीनंतर ३० दिवसांच्या आत खर्चाबाबत कसलाही तपशील सादर न केल्याचे सिद्ध झाले़ त्यामुळे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे़ अहमदपूर तालुक्यातील १६३ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले असून देवणी तालुक्यात ४, चाकूर तालुक्यात ३३ आणि लातूर तालुक्यात ३२ अशा एकूण २३२ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे़ रद्द करण्यात आलेल्या सदस्यांना विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यास वाव आहे़ मात्र सद्य स्थितीत या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे़ सर्वाधिक अहमदपूरचे सदस्य़़़२३२ ग्रामपंचायत सदस्यांपैकी सर्वाधिक सदस्य संख्या अहमदपूर तालुक्यातील आहे़ या तालुक्यात १६३ जणांनी निवडणूकीत केलेला खर्च सादर केला नाही़ त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे़ अहमदपूर पाठोपाठ चाकूर तालुक्यात ३३ आणि लातूर तालुक्यात ३२ जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक विभागातून देण्यात आली़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात २३२ जणांचे ग्रा़प़ंसदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 00:48 IST