औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातून वाहणाऱ्या नाल्यामुळे मोकाट कुत्री, पक्ष्यांच्या संख्येत वाढ होण्यास हातभार लागत आहे. ही मोकाट कुत्री आणि पक्षी वेळोवेळी विमानांसाठी अडथळा निर्माण करीत आहेत. नाल्यामुळे उद््भवलेली ही परिस्थिती विमानांसाठी धोकादायक ठरू पाहत आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून नाल्याचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जबलपूर येथे नुकत्याच घडलेल्या विमान अपघाताच्या घटनेनंतर हवाई मंत्रालय खडबडून जागे झाले असून, देशातील सर्व विमानतळांच्या सुरक्षेची पाहणी करण्यात येत आहे. नुकतीच एका पथकाने चिकलठाणा विमानतळाची पाहणी केली. या पाहणीत विमानतळाच्या हद्दीतून वाहणाऱ्या नाल्यामुळे विमानतळाला मोठा धोका निर्माण झाला आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आजघडीला विमानतळाच्या परिसरातील विविध भागांमधून निघणारे सांडपाणी थेट उघड्या नाल्याद्वारे सोडले जात आहे. परिसरातील विविध भागांबरोबर नाला थेट विमानतळाच्या हद्दीतून जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याबरोबर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नाला भूमिगत करणार विमानतळाच्या हद्दीतून वाहणाऱ्या नाल्याची सफाई करण्याची विशेष मोहीम प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून हाती घेतली जाणार आहे. शिवाय पाईप टाकून उघडा नाला बंदिस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी कालावधीत पक्षी आणि मोकाट कुत्र्यांपासून सुटका होईल, अशी अपेक्षा आहे. विमानतळाच्या हद्दीकडे दुर्लक्ष नाल्याची परिस्थिती बाहेरून चांगली आहे; परंतु विमानतळाच्या हद्दीतील नाल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीमुळे विमानतळाच्या हद्दीतील नाले पाईप टाकून भूमिगत केले जाईल, अशी माहिती निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी दिली.
नाल्याचा विमानांना धोका
By admin | Updated: December 24, 2015 00:01 IST