औरंगाबाद : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ नवरात्रोत्सवातील क्रिस्टल स्वरविहार रासदांडिया यंदा रद्द करण्यात आल्याची घोषणा दांडियाचे आयोजक आणि आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली. राज्यभरातील इतर मंडळांनीही असाच निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. नवरात्र हा स्त्रीशक्तीचा उत्सव समजला जातो; परंतु कोपर्डीच्या घटनेमुळे राज्यातील महिला, मुली सुरक्षित नसल्याचे दिसून येते, अशा परिस्थितीत स्त्रीशक्तीचा हा उत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नसून, औरंगाबादेत गेल्या १६ वर्षांपासून घेतला जाणारा क्रिस्टल स्वरविहार रासदांडिया यंदा रद्द करण्यात आला आहे. राज्यातील इतर मंडळांनीही याचे अनुकरण करावे, असे आवाहनही पाटील यांनी केले. क्रिस्टल स्वरविहार दांडियाचे अभिजित देशमुख, नितीन सरकटे, विनोद सरकटे यावेळी उपस्थित होते. कोपर्डी घटनेला आता तीन महिने उलटले आहेत; परंतु अद्यापही आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले नसून, आरोपींना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत मराठा समाज सूतक पाळणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.मराठा आरक्षण टिकावेमराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. हा निर्णय पुढे न्यायालयात टिकला नाही. आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयास १७ महिन्यांचा कालावधी उलटूनही राज्य सरकारतर्फे न्यायालयात शपथपत्रही दाखल करण्यात आलेले नाही तसेच वकिलांची नियुक्तीही करण्यात आलेली नव्हती. याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयात येत्या ३ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार असून, पूर्वीच्या सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकावे, यासाठी शासनाने ठोस प्रयत्न करण्याची गरज असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.
‘कोपर्डी’ घटनेच्या निषेधार्थ क्रिस्टल स्वरविहार दांडिया रद्द
By admin | Updated: September 28, 2016 00:37 IST