औरंगाबाद : जायकवाडीहून औरंगाबादेत पाणी आणण्यासाठी महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करावे लागतात. पाणीपट्टीच्या माध्यमातून मनपाला अर्धीही रक्कम मिळत नाही. कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करून मनपा प्रशासन मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकरांची तहान भागवित आहे. मनपाच्या शुद्ध पाण्यावर काही नागरिकांनी कुटीर उद्योग सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वत: मनपा आयुक्तांनी या खळबळजनक घटनेवर प्रकाश टाकला, हे विशेष.बुधवारी सकाळी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया मनपा अधिकाऱ्यांसह पैठणगेट भागातील औषधी भवनची इमारत पाहण्यासाठी गेले. इमारतीच्या खालून पाण्याचा प्रवाह मागील काही वर्षांपासून बंद झाला आहे. पावसाळ्यापूर्वी पाण्याला नैसर्गिक प्रवाह कसा मिळवून देता येईल, यासाठी आयुक्तांनी पाहणी केली. पाहणी करीत असताना दलालवाडी रोडवर एक अर्धे शटर लावलेल्या दुकानात पाण्याचे जार भरण्यात येत होते. एवढ्या गजबजलेल्या भागात पाण्याचे जार कशा पद्धतीने भरले जात असतील असा प्रश्न आयुक्तांना पडला. त्यांनी लगेचच दुकानात धाव घेतली. दुकानातील दृश्य पाहून आयुक्तांसह मनपा अधिकारीही क्षणभर अवाक् झाले. महापालिकेच्या पाण्यावर हा जार विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या लाईनमधून मोठा नळ घेण्यात आला आहे. नळाद्वारे पाणी एका हौदात पडत होते. हौदातील पाणी थेट जारमध्ये भरून विक्री करण्यात येत होते. सुनील देवडा हे व्यावसायिक पाण्याची विक्री करीत होते.एवढ्या राजरोसपणे पाण्याची विक्री सुरू असतानाही मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही बाब कशी कळाली नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहरातील अनेक हॉटेलला महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी अवैधरीत्या नळ कनेक्शन घेतले आहेत. महापालिकेने या गंभीर प्रकाराकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्याचप्रमाणे शहरात वॉशिंग सेंटरची संख्याही जवळपासन शंभरच्या वर गेली आहे. या व्यावसायिकांकडे पाणी येते तरी कोठून, याचा तपास मनपाने कधीच केला नाही. अनेक वॉशिंग सेंटरचालक मनपाच्याच पाण्याचा वापर करीत आहेत.मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मनपाचे पाणी विकणाऱ्यांवर त्वरित फौजदारी कारवाई करावी, असे आदेश दिले. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे उपस्थित होते.
मनपाच्या पाण्यावर ‘कुटीर’ उद्योग
By admin | Updated: May 5, 2016 01:28 IST