हिंगोली : कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काही विकासकामे प्रलंबित राहिली आहेत. ही विकास कामे आता आचारसंहिता संपल्यामुळे त्वरीत पुर्ण करणार असल्याची माहिती नवनिर्वाचित खा. राजीव सातव यांनी कळमनुरी येथे पत्रकारांशी बोलताना रविवारी दिली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून राजीव सातव यांनी १६३२ मतांनी निसटता विजय मिळवून सर्वांना चकित केले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातील नेत्यांचीही रिघ लागली आहे. रविवारी नवनिर्वाचित खा. राजीव सातव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काही विकासकामे प्रलंबित राहिली असून आता आचारसंहिता संपल्याने ही कामे पूर्ण केली जातील, असे सांगितले. हिंगोली लोकसभा मतदार संघातील विकासकामे करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगत त्यांनी जनतेने दाखविलेल्या विश्वासास कदापि तडा जावू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले. निवडणुकीत काँग्रेससह राष्टÑवादी काँग्रेस व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेते व कार्यकर्त्यांचीही भरपूर मदत झाली असल्याचे ते म्हणाले. आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे आपले कोणाशीही मतभेद नाहीत. सर्वांना सोबत घेवून काम करण्याची भूमिका कायम राहणार असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
प्रलंबित विकासकामे त्वरीत पूर्ण करणार
By admin | Updated: May 19, 2014 00:15 IST