परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक २३ मधील स्वच्छता कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने व इतर कामांसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने कामे खोळंबली आहेत. नगरसेविका वनमाला देशमुख यांनी २१ आॅक्टोबर २०१३ मध्ये आयुक्तांना या संदर्भात तक्रार केली होती. परंतु, अद्यापपर्यंत उपाययोजना झालेली नाही. प्रभाग क्रमांक २३ हा भाग कारेगाव रोड परिसरात येतो. मनपाला सर्वात जास्त कर देणारा हा भाग आहे. तसेच हा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. परंतु, या प्रभागासाठी केवळ दोन स्वच्छता कर्मचारी असून ते देखील नियमित येत नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून स्वच्छता निरीक्षकांना कल्पना देऊनही या विषयी उपाययोजना झालेली नाही. मोठा प्रभाग असल्याने या प्रभागात सहा स्वच्छता कर्मचार्यांची आवश्यकता आहे. त्याच प्रमाणे पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी एकही कर्मचारी उपलब्ध नाही. खाजगी कर्मचार्यांना आणून पथदिवे दुरुस्त करावे लागतात. या खाजगी कर्मचार्यांना विद्युत वाहिन्यांची माहिती नसल्याने जिवीतास धोका संभवतो. त्याच प्रमाणे प्रभागातील कचर्याचे ढीग उचलण्यासाठी ट्रॅक्टरही उपलब्ध करुन दिले जात नाही. त्यामुळे प्रभागात अनेक ठिकाणी कचर्याचे ढिगारे जमा झाले आहेत. पाण्याचा देखील मूबलक साठा असताना केवळ नियोजन नसल्याने आठ ते दहा दिवसांना पाणी मिळत आहे. या सर्व कारणांमुळे नागरिकांची गैरसोय होत असून या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नगरसेविका वनमाला देशमुख यांनी केली आहे. या प्रश्नावर मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातच आयुक्तांना निवेदन दिले होते. परंतु, सहा महिन्यांचा कालावधी ओलांडला तरी कुठलीही हालचाल झालेली नाही. घाणीचे पसरले साम्राज्य प्रभाग २३ मधील अनेक समस्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून या भागाची स्वच्छता करण्यात आली नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मनपा मात्र कर्मचार्यांचे कारण देऊ लागले आहे.
स्वच्छतेची कामे खोळंबली
By admin | Updated: May 19, 2014 00:16 IST