छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्तेकडे वाटचाल केली आहे. तर दुसरीकडे स्वबळावर लढलेल्या शिंदेसेनेला मोठा फटका बसला आहे. या अनपेक्षित निकालांनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. "पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, याची जबाबदारी मी स्वीकारतो," असे म्हणत त्यांनी अंतर्गत राजकारण आणि बदललेल्या जातीय समीकरणांकडे अंगुलीनिर्देश केला.
मुलं जिंकली तरी मन अस्वस्थ या निवडणुकीत संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा आणि मुलगा सिद्धांत या दोघांनीही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मात्र, या यशाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. "माझी मुलं निवडून यावीत हे माझे टार्गेट कधीच नव्हते, पक्ष जिंकणे हे महत्त्वाचे होते. मुलं जिंकली याचा आनंद नाही, पण पक्षाचं नुकसान झालं याचं जास्त दुःख आहे," असे भावूक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
पराभवाची 'पोस्टमॉर्टम' कारणे शिरसाट यांनी पराभवाचे विश्लेषण करताना सांगितले की, "प्रभाग पद्धतीमुळे जातीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. गुलमंडी हा आमचा पारंपारिक गड होता, पण तिथेही एमआयएमने मुसंडी मारली. अंतर्गत राजकारण, बदल्या आणि ज्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला हवे होते तिथे दुर्लक्ष झाल्याचा फटका आम्हाला बसला आहे. एखाद्या वेळेस अशी लाट येते की त्याला सामोरे जावेच लागते."
भाजप आणि विरोधकांवर भाष्य भाजपच्या एकहाती सत्तेवर बोलताना ते म्हणाले की, "भाजपची सत्ता आली यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. अनेक ठिकाणी तेच चित्र आहे. युती झाली असती तर काय झाले असते, या चर्चेला आता अर्थ नाही." तसेच एमआयएमबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, एमआयएम २५ च्या पुढे जाईल ही भीती मी आधीच व्यक्त केली होती आणि दुर्दैवाने तेच घडले. मुंबईच्या निकालावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रचारावर टोला लगावला. "मुंबई तोडणार ही एकच कॅसेट लोकांनी नाकारली असून विकासाला पसंती दिली आहे," असे ते म्हणाले.
Web Summary : Sanjay Shirsat accepts responsibility for the party's poor performance in the municipal elections, despite his children winning. He cited changing demographics, internal politics, and strategic oversights as contributing factors. He acknowledged BJP's victory and criticized Uddhav Thackeray's campaign in Mumbai.
Web Summary : संजय शिरसाट ने अपने बच्चों की जीत के बावजूद नगर निगम चुनावों में पार्टी के खराब प्रदर्शन की जिम्मेदारी ली। उन्होंने बदलते जनसांख्यिकी, आंतरिक राजनीति और रणनीतिक चूक को योगदान कारक बताया। उन्होंने बीजेपी की जीत को स्वीकार किया और उद्धव ठाकरे के मुंबई में अभियान की आलोचना की।