लोहारा : शहरासह तालुक्यात भारत संचार निगमच्या मोबाईल सेवेसह लँडलाईन सेवा म्हणजे रामभरोसे झाली असून, याचा लोहारा येथे भारत संचार निगमचे दूरध्वनी केंद्र असून, येथील उपअभियंता पद मागील सहा-सात महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळे उमरगा येथील उपअभियंता एन. जे. सूर्यवंशी यांच्याकडे येथील पदभार आहे. त्यात एक टेलिफोन मेकॅनिक (टीएम) पद भरलेले आहे. तर दोन कंत्राटी कामगार आहेत. दोन ते तीन वर्षापूर्वी शहरात सातशेच्या जवळपास लँडलाईन कनेक्शन होते. पण त्यानंतर आलेली मोबाईल सेवा, त्यात सेवेतील व्यत्यय यामुळे अनेकांनी लँडलाईन सेवा बंद केली. सध्या साधारण ३०० लँडलाईन शहरात आहेत. यातील बहुतांश कनेक्शन हे इंटरनेट सेवा, फॅक्स तसेच शासकीय कार्यालय या ठिकाणीच वापर केला जात आहे. नेटवर्कमध्ये सातत्याने व्यत्यय येत असल्याने ग्राहकांना याचा फटका सोसावा लागतो. असे असतानाच सध्या छात्रभारती परिसर, हिप्परगा रोड भागात अंतर्गत वायरिंगचे काम चालू असल्याने आठ-दहा दिवसांपासून या भागातील लँडलाईन सेवा पूर्णपणे बंद आहे. त्यात होणारा वीज पुरवठा खंडित झाला की, मोबाईल सेवाही बंद पडते. जनरेटर आहे. पण अशावेळी तेही चालू केले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील माकणी, जेवळी, कानेगाव, सास्तूर, सालेगाव, आष्टाकासार या गावात एक्सचेंज कार्यालये आहेत. त्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा कायम आहे. लोहारा येथील टीएमकडे कानेगावचा पद्भार, माकणीच्या टीएमकडे सालेगावचा, येणेगुरच्या टीएमकडे जेवळीचा पद्भार अशी दुरवस्था आहे. याकडे बघण्यास कोणाकडेही वेळ नसल्याचे चित्र आहे. एक्सचेंजच्या ठिकाणी कंत्राटी कामगार आहेत. मात्र तेही तुटपुंजा ३०० ते ४०० रुपये मानधनावर. त्यांचे मानधन आज वाढेल उद्या वाढेल या आशेवर काम करीत आहेत. एखादे नवीन लँडलाईनचे कनेक्शन द्यायचे म्हटले तर वायर नाही. इन्स्टुमेंट नाही, त्यामुळे करायचे तरी काय, असा प्रश्न या कंत्राटी कामगारांना पडत आहे.लोहारा तालुक्यात साधारण एक हजारपेक्षा जास्त लँडलाईन कनेक्शन होते. ते आता सातशे ते आठशेवर आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यात साधारण १० ते १५ हजार मोबाईलधारक बीएसएनएलची सेवा वापरतात. यातील ८० टक्के ग्राहक हे कृषी प्लॅनचे सीम वापरत आहेत. दरम्यान, तालुक्यात मोबाईल, लँडलाईन, इंटरनेट सेवा ही महिन्यातून दोन ते तीनदा सतत विस्कळीत होत आहे. यासंदर्भात प्रभारी उपअभियंता एन.जे. सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आमची सेवा ही सुरळतीच आहे. मात्र सध्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ‘ओएफसी’ वायर सातत्याने तुटून सेवा विस्कळीत होत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. (वार्ताहर)
‘बीएसएनएल’कडे साहित्याचाही तुटवडा
By admin | Updated: August 23, 2015 23:45 IST