औरंगाबाद : पैठणपासून औरंगाबाद शहरापर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी ठेका घेतलेल्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला बुधवारी रात्री मनपाने आणखी एक जोरदार हादरा दिला. कंपनीसोबत केलेला करार यापूर्वीच मनपाने रद्द केला आहे. आता कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर मनपाने शहराचा पाणीपुरवठा खाजगी कंपनीकडे सोपविला होता. तब्बल ९०० कोटी रुपयांचा हा ठेका औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला देण्यात आला होता. मागील १८ महिन्यांमध्ये कंपनीने शहरात कामही केले. करारानुसार कंपनीने कोणतेच काम केले नाही. त्यामुळे मनपाच्या सर्वसाधारण सभेत करार रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. यानंतर कंपनीने चार महिने न्यायालयीन लढा दिला. २ दिवसांपूर्वीच खंडपीठानेही मनपाच्या बाजूने निर्णय दिला. आता शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा मनपाने आपल्या ताब्यात घेतला आहे. बुधवारी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कंपनीला ब्लॅकलिस्ट का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस बजावली आहे. यामध्ये अनेक आरोप कंपनीवर ठेवण्यात आले आहेत. करारानुसार कंपनीने जायकवाडीहून औरंगाबादपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम किंचित प्रमाणात सुरू केले. या कामात अजिबात प्रगती नव्हती. बाजारातून १०३ कोटी रुपयांचे कर्ज उचलले. हे पैसे बॅलन्स शिटमध्ये न दाखविता कंपनीतील इतर भागीदार कंपन्यांना वाटण्यात आले. शहरातील पाणीपुरवठाही कंपनीला सांभाळता आला नाही. शहरात फक्त ८० किलोमीटर अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात आल्या. १८ महिन्यांमध्ये किमान १५० किलोमीटर लाईन टाकायला हव्या होत्या, आदी आरोप नोटीसमध्ये आहेत.
‘समांतर’ला ‘ब्लॅकलिस्ट’ची नोटीस
By admin | Updated: October 27, 2016 00:54 IST