बीड : बारावी परीक्षेतील घवघवीत यशाची परंपरा दहावी परीक्षेतही बीडच्या विद्यार्थ्यांनी कायम राखली. ९५.०२ टक्के गुणांसह विक्रमी यश नोंदविताना दहावीच्या निकालातील दबदबा अबाधित राखला. औरंगाबाद विभागाच्या एकूण टक्क्यांपेक्षाही बीडने पाच टक्के गुण जादा घेत यशाचा आलेख उंच नेऊन ठेवला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१५ मध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बीड जिल्ह्यातील ३८ हजार ३३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ३८ हजार १०३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३६ हजार २०६ विद्यार्थी यशस्वी झाले. विशेष प्राविण्यासह (७५ टक्क्यांपेक्षा अधिक) १२ हजार ७११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत १५ हजार ४५३, द्वितीय श्रेणीत ७ हजार १६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्या खालोखाल १०२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १ हजार ८९७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. बीड जिल्ह्याने मिळविलेले एकूण ९५.०२ टक्के गुण हे विभागात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता होती. दुपारी १ वाजेनंतर मंडळाच्या वेबसाईडवर निकाल जाहीर झाला. अनेकांनी नेट कॅफे गाठून तर काहींनी मोबाईलवरुनच निकाल जाणून घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. पेढे वाटून आंनद साजरा केला. १०६२ ‘रिपीटर’ यशस्वी गतवर्षी अनुत्तीर्ण १५७० विद्यार्थ्यांनी मार्चमध्ये पुन्हा परीक्षा दिली. १०६२ विद्यार्थी यशस्वी तर ५०८ पुन्हा अनुत्तीर्ण झाले. (प्रतिनिधी) परीक्षेस बसलेल्या ३८ हजार १०३ विद्यार्थ्यांमध्ये २२ हजार ५११ मुले व १५ हजार ५९२ मुलींचा समावेश आहे. ४त्यापैकी २१ हजार २५९ मुले व १४ हजार ९४७ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांची टक्केवारी ९४़४४ तर मुलींची टक्केवारी ९५़८६ टक्के इतकी आहे़ ४मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या.
बीडचा झेंडा कायम
By admin | Updated: June 9, 2015 00:20 IST