- प्राची पाटीलछत्रपती संभाजीनगर : अन्नावर घोंगावणाऱ्या माशा, खालून वाहणारे सांडपाणी, कचरा, खरकटे अन्न, तंबाखूने रंगलेले रस्ते अशा घाणेरड्या आणि अस्वच्छ वातावरणात शहरातील निम्म्याहून अधिक नागरिक आपले पोट भरत आहेत. ही दयनीय स्थिती शहरातील सुमारे ७० टक्के भागांमध्ये दिसून आली. जागतिक अन्नसुरक्षा दिनानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील मोक्याच्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी अन्नसुरक्षेचे नियम सर्रासपणे पायदळी तुडविले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. कुठलीही स्वच्छता न पाळता अन्न तयार केले जात आहे. अशा प्रकारचे अन्न खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो, असा थेट इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
शहरातील बसस्थानकांबाहेरचे दृश्य पाहिले तर लक्षात येते की नागरिक कोणत्या प्रकारचे अन्न खाऊन आपली भूक भागवत आहेत. सकाळपासून तयार करून उघड्यावर ठेवलेले, तळलेले, धूळ आणि हवेतील विषारी कणांनी भरलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. अन्न बनवतानाही स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष होते. विक्रीचा परिसर, स्वच्छता आणि अन्न बनवण्याची पद्धत हे सर्व घटक अत्यंत चिंताजनक आहेत.
वाहणारे सांडपाणी आणि खाद्यपदार्थसिडको बसस्थानकासमोर सुमारे ११ स्टॉल्सवर ऑम्लेट, समोसा, वडापाव, पकोडे, पावभाजी, पाणीपुरी, असे विविध पदार्थ विकले जातात. मात्र, याच परिसरात सांडपाणी, तंबाखूने थुंकलेली घाण, कचरा असे वातावरण असते. स्वच्छतेची तपासणी करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागाची असली तरी त्यांचे काम संथगतीने सुरू असते.
पुन्हा पुन्हा वापरले जाणारे तेलशहरातील अनेक स्टॉल्समध्ये एकच तेल अनेकवेळा वापरले जाते. यामुळे तेलाचा दर्जा खालावतो व त्यात हानिकारक पदार्थ तयार होतात. परिणामी, हृदयरोग, कर्करोग व अन्य गंभीर आजारांचा धोका वाढतो. ग्राहकांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. अन्न व औषधी प्रशासनही याला तितकेच जबाबदार आहे.
अशा अस्वच्छतेची ठिकाणे: सिडको, मध्यवर्ती बसस्थानक, औरंगपुरा, कॅनॉट प्लेस, सिटी चौक, रोशन गेट, शहाबाजार, रेल्वे स्टेशन रोड
कारवाई सुरू असतेअन्न व औषधी प्रशासन विभाग दर्गा रोड, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, जाधववाडी परिसरात जनजागृती मोहीम राबवते. नुकतीच दर्गा परिसरात स्टॉल्सवर अन्न तपासणी केली आहे. स्ट्रीट फूड संदर्भात आमच्या विविध मोहिमा सुरू असतात. लायसन्स तपासणीही केली जाते. वेगवेगळे नमुने तपासणीसाठी घेतले जातात.- दयानंद पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन
२०२४ ते मे २०२५ पर्यंतची आकडेवारी२०२४ -४९ कारवायामे २०२५ पर्यंत-१५ कारवाया
कॅन्सर होण्याची शक्यताअनेक खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समध्ये एकच तेल वारंवार वापरले जाते. खाण्याचा रंग, साखर, मीठ, तेल या सर्व घटकांचे प्रमाणही जास्त असते. या सर्व गोष्टींची परिणीती पुढे जाऊन कर्करोगामध्ये होऊ शकते. यामुळे आतड्याचा, पोटाचा, स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. शक्यतो उघड्यावरचे खाणे टाळायला हवे.-डॉ. अरविंद गायकवाड, ओएसडी (स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट)