औरंगाबाद : इंग्रजी ही जगाची भाषा आहे. ही भाषा प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. देशासाठी प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी होऊन न थकता रात्रंदिवस काम करावे, असा सल्ला सेवानिवृत्त विदेश सचिव तथा अमेरिका, चीन येथे भारताच्या राजदूत राहिलेल्या निरुपमा राव यांनी शहरातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला.पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने ताज हॉटेलजवळील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सभागृहात निरुपमा राव यांचे ‘निरुपम संवाद : वेध व्यक्तिमत्त्वाचा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. केवळ महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस यांच्यासाठी हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर्णा अमितेशकुमार, नाथ व्हॅली हायस्कूलचे प्रायार्य रणजित दास आणि मोनिका दास यांची उपस्थिती होती. याप्रसंगी निरुपमा राव म्हणाल्या की, ४० वर्षांपूर्वी मी या शहरात राहत होते. येथील विद्यापीठात एम. ए. इंग्रजीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. या शहराशी आपले जुने नाते असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. इंटरनेट, सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमुळे आता विविध देशांच्या सीमा धूसर झाल्याचे त्यांनी नमूद केले. विदेश सेवेसाठी होती लग्न न करण्याची अटया कार्यक्रमास पोलिसांच्या गणवेशात मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असल्याचे पाहून अभिमान वाटत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, मी जेव्हा विदेश सेवेसाठी अर्ज दाखल केला तेव्हा लग्न न करण्याची अट होती. आपल्याला ही अट मान्य असल्याचे त्यात नमूद केले होते. त्यावेळी आपल्यासोबत कार्यरत असलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांना लग्नामुळे आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले होते. पुढे दोन वर्षांनंतर ही अट रद्द झाली.प्रास्ताविक पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी के ले. सूत्रसंचालन गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी केले. आभार वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी मानले. (पान २ वर)कोणत्या देशात महिलांना सर्वाधिक स्वातंत्र्य आहे, असा प्रश्न एका महिला पोलिसाने विचारला असता त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्याची तुमची व्याख्या काय आहे? महिलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षणाचे तसेच आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी आणि सुरक्षितता म्हणजे स्वातंत्र्य आहे, असे आपले मत आहे. त्यानुसार पाश्चिमात्य देशातील महिलांची सरासरी परिस्थिती चांगली आहे. ४चीनेही महिलांवरील बंधने हटविलेली आहेत आणि भारतातही महिलांना स्वातंत्र्य असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आशियातील आपल्या शेजारील पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका इ. देशांतील महिलांवर विविध बंधने असल्याचे त्यांनी नमूद केले. औरंगाबादशी ऋणानुबंधनिरुपमा राव यांचे औरंगाबादशी जुने संबंध आहेत. त्यांचे वडील लष्करात कार्यरत होते. त्यावेळी त्या छावणीतील मिलिटरी एरियात राहत होत्या. ४० वर्षांपूर्वी औरंगाबादेत राहत असताना त्यांनी येथील विद्यापीठातून एम. ए. इंग्रजी ही पदवी प्राप्त केली. येथे राहूनच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय लोकप्रशासन सेवेच्या १९७३ सालच्या बॅचच्या त्या अधिकारी झाल्या. त्यांनी पसंतीने विदेश सेवा निवडली.
देशासाठी महत्त्वाकांक्षी बना
By admin | Updated: June 23, 2016 01:40 IST