औरंगाबाद : समांतर जलवाहिनीबाबतची जनहित याचिका आणि इतर दोन याचिका न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए. आय. एस. चिमा यांच्या खंडपीठात सुनावणीस निघाल्या असता मनपा आयुक्तांनी समांतर जलवाहिनीसंदर्भात शपथपत्र दाखल करावे, असे निर्देश खंडपीठाने आज दिले. याचिकांची पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी होणार आहे. सुनावणीच्या वेळी अॅड. अनिल गोलेगावकर यांनी मनपा आयुक्तांनी कंत्राटदार औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी यांना ११ डिसेंबर २०१५ रोजी बजावलेली कारणेदर्शक नोटीस न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणली. सदर कंत्राटदारांनी करारानुसार मुदतीत कामे केली नसल्यामुळे त्यांचा करार रद्द का करण्यात येऊ नये, अशी कारणेदर्शक नोटीस मनपा आयुक्तांनी कंत्राटदारास बजावली आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर प्रा. दिवाण यांचे वकील उदय बोपशेट्टी यांनी मनपा आयुक्तांनीच शपथपत्र दाखल करण्याची विनंती न्यायालयास केली. मनपा आयुक्तांनी यासंदर्भात कारवाई सुरू केल्यामुळे त्यांनीच शपथपत्र दाखल करणे योग्य राहील, असे निर्देश खंडपीठाने दिले. समांतर जलवाहिनीसंदर्भात राजेंद्र दाते पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली असून, विजय शिरसाठ व प्रा. डॉ. विजय दिवाण यांनीसुद्धा यासंदर्भात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अनिल गोलेगावकर व अॅड. मधुर गोलेगावकर, अॅड. उदय बोपशेट्टी आणि अॅड. प्रदीप देशमुख तर महापालिकेच्या वतीने अॅड. नंदकुमार खंदारे, कंत्राटदार कंपनीतर्फे अॅड. कर्पे आणि शासनातर्फे सहायक सरकारी वकील भारस्वाडकर हजर होते. तर मनपाचे शहर अभियंता पानझडे, कार्यकारी अभियंता कोल्हे, अभियंता फालक आणि विधि अधिकारी ओ. सी. शिरसाठ सुनावणीच्या वेळी हजर होते.
समांतर जलवाहिनीसंदर्भात शपथपत्र दाखल करावे -खंडपीठ
By admin | Updated: December 18, 2015 23:47 IST