औरंगाबाद : खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेला कुख्यात आरोपी गौरव नानासाहेब वानखेडे (२०, रा. त्रिवेणीनगर, एन ७, सिडको) हा नागरिकांना दुखापत करीत गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे, मारामारी, दंगल करणे, बेकायदा जमाव जमवणे, सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचे प्रमाण वाढले होते. परिसरात दहशत निर्माण झाल्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या आदेशाने त्यास ‘एमपीडीए’ कायद्यातंर्गत वर्षभरासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
गौरव वानखेडे हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याशिवाय त्याच्या विरोधात जबरी चोरी, मारमारी, दंगल, बेकायदा जमाव जमविण्यासह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यास गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली होती. मात्र, त्याच्यावर काहीच परिणाम होत नसल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली होती. त्याच्या जीवितास धोका पोहोचवून सार्वजनिक सुव्यवस्थेसही तो बाधा निर्माण करीत होता. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी केले.
त्याला सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक अवचार, कैलास अन्नलदास यांच्या पथकाने ताब्यात घेत हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सिडकोचे निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अवचार, अन्नलदास, सहायक उपनिरीक्षक द्वारकादास भांगे, हवालदार सुभाष शेवाळे, शिवाजी भोसले, महादेव दाणे, विशाल सोनवणे, किरण काळे, सुनील जाधव, दीपाली सोनवणे यांनी केली.