औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका गुरुवारी निकाली निघाली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे शहरात १२६ वॉर्ड तयार केले. ४२ प्रभागांचा आराखडा सादर केला.
नवीन आराखड्यानुसार एक वॉर्ड ९ ते १० हजार लोकसंख्येचा असणार आहे. ३ वॉर्डांच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास ३० हजार असेल.राज्य निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्यातील २२ महापालिकांसाठी स्वतंत्र सुधारित आदेश काढला. औरंगाबाद महापालिकेलाही नोव्हेंबर महिन्यात कच्चा आराखडा तयार करून आयोगाकडे सादर करावा, असे म्हटले. त्यानुसार मनपा प्रशासनाने आराखडा सादर केला आहे. पूर्वी मनपातील सदस्यांची संख्या ११५ होती. आता १२६ करण्यात आली असून प्रभागांची संख्या ४२ झाली आहे. २०११ च्या लोकसंख्येनुसार २,२८६ प्रगणक गट असल्यामुळे त्यातूनच वॉर्ड आणि प्रभाग तयार करण्यात आले. १२ लाख २८ हजार ३२ इतकी लोकसंख्या, ९ लाख ३९ हजार ४५८ मतदारसंख्या गृहीत धरण्यात आली. १२६ वॉर्डांपैकी ६३ वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील.
नवीन प्रभाग रचनेत २४ एससी, ३ एसटी, ३४ ओबीसी आणि ६५ सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्य राहतील, असा अंदाज आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय पुढील प्रक्रिया अशक्य आहे. आयोगाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर आराखडा प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. आक्षेप व सूचना विचारात घेऊन प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम केला जाईल. त्यानंतर प्रभाग रचनेतील वॉर्डनुसार नव्याने आरक्षण सोडत काढली जाईल.
२०१५ मधील पक्षीय बलाबलशिवसेना- २९भाजप- २३एमआयएम- २४काँग्रेस- ११बहुजन समाज पार्टी- ५राष्ट्रवादी काँग्रेस- ४रिपाइं (डेमोक्रॅटिक)- २अपक्ष- १७एकूण - ११५
आयोगाने दिलेली लोकसंख्या-१२,२८,०३२अनुसूचित जाती लोकसंख्या- २,३८,१०५अनुसूचित जमाती - १६,३२०