नाशिक : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षांचे निकाल अतिशय धक्कादायक व अनपेक्षित लागल्याने निकालात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची शक्यता आहे. या निकालामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होणार असल्याने विनामूल्य पेपरची पुनर्तपासणी केली जावी, अशा मागणीचे निवेदन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना मनविसेकडून देण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०१३-१४ च्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात अनुत्तीर्ण दाखविल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांच्या पेपरची विनामूल्य पुनर्तपासणी केली जावी. त्याचबरोबर विधी शाखेच्या चौथ्या वर्षाच्या ‘ज्युरीसप्रुडेन्स’ या विषयातदेखील विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण घोषित करण्यात आल्याने त्याबाबतचाही सकारात्मक निर्णय घ्यावा. एलएलएम अभ्यासक्रमाची शुल्कवाढ अन्यायकारक असून, त्यावर त्वरित तोडगा काढला जावा. तसेच नाशिक पीव्हीजी महाविद्यालयाच्या वाणिज्य तृतीय वर्षाच्या लेखापरीक्षण व करनिर्धारण या विषयाचे बरेच विद्यार्थी अनुत्तीर्ण घोषित करण्यात आल्याने विद्यापीठाने याबाबतचादेखील सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद केले. यावेळी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही. बी. गायकवाड, रजिस्ट्रार डोकेफोडे, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष खंडेराव मेढे, अजिंक्य गिते, मुकेश शहाणे, जय कोतवाल, संदीप शिंदे, नाना निगळ, राकेश परदेशी, तुषार मटाले आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
८ लाख पशुधन चाऱ्याअभावी संकटात
By admin | Updated: August 19, 2014 01:23 IST