औरंगाबाद : मराठवाड्यात आगामी काळात पाणी व चाराटंचाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागातील सर्व जिल्ह्यांना टंचाई आराखडे तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत ६१ कोटी ६८ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. विभागात टँकरचा आकडा १३०० पर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यात सध्या ५०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. लघु आणि मध्यम पाणीसाठे कमी होत चालल्यामुळे पाण्याची टंचाई वाढत चालली आहे. नांदेड, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत सर्वाधिक मागणी टँकरची आहे. पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाकडून टँकर, विहीर अधिग्रहण तसेच पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून टंचाई निवारणाचे प्रयत्न सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातून आगामी तीन महिन्यांसाठी १७ कोटी ५९ लाख १२ हजार रुपयांचा अंदाजित खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. बीडमध्ये १४ कोटी २२ लाख ३९ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ६ कोटी ९८ लाख रुपये लागणार आहेत.आगामी दोन महिन्यांत टँकरचा आकडा १३०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरनंतर मराठवाड्यात टंचाईची स्थिती आणखी वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आॅगस्ट महिन्यात मराठवाड्यात टँकरने दीड हजारचा आकडा गाठला होता. मात्र पावसामुळे ही संख्या कमी झाली होती. ती संख्या आता पुन्हा वाढू लागली आहे.
६१ कोटींचा टंचाई आराखडा तयार
By admin | Updated: November 17, 2015 00:33 IST