औरंगाबाद : पदवी परीक्षेसाठी तैनात असलेली जवळपास ३५० बैठी पथके बरखास्त करण्याचा धाडसी निर्णय आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला. या निर्णयामुळे विद्यापीठाचे ३ ते ४ कोटी रुपये वाचणार आहेत. यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, कॉपीमुक्त परीक्षेसाठी विद्यापीठाने अनेक वर्षांपासून परीक्षा केंद्रांवर बैठी पथके कार्यरत केलेली होती. यामध्ये महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा समावेश केला जात होता. या पथकांच्या भत्त्यापोटी विद्यापीठाला दरवर्षी जवळपास ४ कोटी रुपये खर्च करावे लागत असत. दुसरीकडे या पथकांची कामगिरी मात्र शून्य असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले. शिवाय या पथकांतील सदस्यांनी आतापर्यंत एकाही परीक्षा केंद्राविषयी आक्षेप घेतलेला नाही, की कुठे कॉपी पकडलेली नाही. दरवर्षी सर्वत्र आलबेल असल्याचा अहवाल ही पथके देत असत. त्यामुळे यापुढे बैठे पथक ही संकल्पनाच रद्द करून विद्यापीठाने जिल्हानिहाय भरारी पथके कार्यरत करण्यावर भर दिला आहे. यासंबंधी आज झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.