तुळजापूर : येथील सेवानिवृत्त कर्मचारी कुलकर्णी यांच्याशी अज्ञात इसमांनी भ्रमणध्वनी, दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांच्या ‘एटीएम’ कार्डचा क्रमांक मिळवून आॅनलाईन पद्धतीने ३५ हजार रूपये दुसऱ्या खात्यावर वळविल्याचा धक्कादायक प्रकार तुळजापूर येथे घडला आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील नळदुर्ग रोडवरील अजिंक्य रेसिडन्सी येथील रहिवासी सेवानिवृत्त कर्मचारी सुदीप नागनाथ कुलकर्णी यांना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अज्ञातांनी ९११४१२२१००३, ९१४६००४८५३ व ०२१४९-६५८०० या भ्रमणध्वनीवरून ‘मी स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा तुळजापूरमधून शाखाप्रमुख बोलतो आहे. तुमचे एटीएम कार्ड एक्सपायर झाले आहे. यासाठी तुम्ही आधार कार्ड घेऊन बँकेत या, तोपर्यंत तुमच्या एटीएम कार्डवरील १९ अंकी क्रमांक सांगा. तुम्ही येईपर्यंत तुमचे कार्ड रिन्हेवल करतो’, असे ऐकल्यानंतर कुलकर्णी यांनी संबंधित क्रमांक सांगितला. त्यानंतर काही क्षणातच अज्ञातांनी त्यांचे खाते आॅनलाईन पद्धतीने हँग करून खात्यावरील ३५ हजार रूपये अन्य खात्यावर वळविले, अशी फिर्याद कुलकर्णी यांनी दिल्यावरून तुळजापूर पोलिस ठाण्यात उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांकधारकांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पोहेकॉ जाधवर हे करीत आहेत. (वार्ताहर)फसवणुकीच्या सदरील प्रकाराबाबत स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखाअधिकारी बाळासाहेब हंगरगेकर यांच्याशी संपर्क साधला असता, बँकेचे अधिकारी खातेदारांशी भ्रमणध्वनीवरून अशाप्रकारे कधीच संपर्क करीत नाहीत. खातेदारांची कोणतीही तक्रार वा अडचण असेल तर त्यांना बँकेत प्रत्यक्ष बोलावून तक्रार काय आहे, ती सांगितली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या फोनवरून आपल्या खात्याविषयी कोणतहीही माहिती सांगू नये, असे ते म्हणाले.
‘एटीएम’चा क्रमांक विचाररून केली ३५ हजारांची फसवणूक
By admin | Updated: May 21, 2015 00:29 IST