औरंगाबाद : एसटी महामंडळ शहरामध्ये मिनी बसेसद्वारे बससेवा सुरू करणार आहे. यामध्ये आतापर्यंत ५ मिनी बसेस (यशवंती बसेस-मिनी बस) शहरात दाखल झाल्या आहेत, तर आणखी २० मिनी बसेस देण्यात येणार असून, जबाबदारी नसली तरी शहर बससेवा चालविण्यासाठी महामंडळ पूर्णपणे प्रयत्नशील आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष रणजितसिंह देओल यांनी दिली.वाल्मी येथे रणजितसिंह देओल यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. एसटी महामंडळातर्फे ४६ शहर बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; परंतु यातील १० ते १२ बसेस ग्रामीण भागात पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे शहर बससेवा अपुरी पडत आहे. याविषयी बोलताना देओल म्हणाले की, रिक्षा, खाजगी वाहनांमध्ये शहर बससेवा चालविण्यात अडचणी येतात. शिवाय शहर बससेवा चालविणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी नाही; परंतु महामंडळाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरासाठी ५ मिनी बसेस देण्यात आल्या आहेत. त्यांची सेवा सुरू झाली आहे त्यामध्ये वाढ केली जाणार असून, आणखी २० मिनी बसेस देण्यात येणार आहेत, असे देओल यांनी सांगितले.
शहरात धावणार २५ मिनी बसेस
By admin | Updated: February 18, 2016 23:57 IST