वाळूज महानगर : बदल्या झालेले ग्रामसेवक नवीन ठिकाणी पदभार स्वीकारण्याचे टाळून जुन्याच ठिकाणी चिकटून बसल्यामुळे तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे आर्थिक व्यवहार बंद करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. ऐन दुष्काळात गंगापूर पंचायत समितीने ग्रामपंचायतींना ‘जोर का झटका’ दिला आहे. यामुळे ग्रामसेवकांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली असून, बदल्यांचे निकष धाब्यावर बसवून नियमबाह्यपणे ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे. दुष्काळी स्थितीत तालुक्यातील २५ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, वाढीव टँकर सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे दहेगावचे सरपंच विक्रम राऊत यांनी गत आठवड्यात पंचायत समितीच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पाणीटंचाई दूर करणे व रोहयोची कामे सुरू करण्याऐवजी पंचायत समितीकडून बदल्यांचा कालावधी नसताना वाळूज, घाणेगाव, जोगेश्वरी, रांजणगाव, आसेगाव, तुर्काबाद खराडी, मांगेगाव, सावखेडा, जिकठाण इ. १४ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. विभागीय आयुक्त अथवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यात आल्या. दुष्काळी स्थितीचा मुकाबला करण्याऐवजी पंचायत समितीकडून ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यात ‘विशेष रस’ घेतला जात असल्यामुळे सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांतही नाराजी आहे.
१४ ग्रा.पं.चे व्यवहार ठप्प
By admin | Updated: December 24, 2015 00:02 IST