जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : वाहनविरहित दिवसाची स्वत:पासून सुरुवात कराचंद्रपूर : प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने तसेच शहरवासीयांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने लोक सहभागातून सुरु केलेला वाहन विरहित दिन अतिशय चांगला उपक्रम आहे. या उपक्रमात लोकसहभाग वाढणे गरजेचे असून वाहनविरहित दिवसाची नागरिकांनी स्वत:पासून सुरुवात केल्यास हा उपक्रम नक्की यशस्वी होईल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित वाहन विरहित दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस उपअधीक्षक जयचंद्र कोथे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी व नागपूर येथील अनिरुध्द रईच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांच्यासह प्रमुख पाहुण्यांनी चांदा क्लब मैदानापासून सायकल रॅलीने सायकल विरहित दिवसाला सुरुवात केली. या रॅलीत शहरातील विविध संघटना व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, रस्त्यावरील शिस्त आवश्यक असून ही शिस्त वे आॅफ लाईफ बनावी. रस्त्यावर शिस्त बिघडू नय, यासाठी सर्वांनी काळजी घेतल्यास वाहन विरहित दिन हा उपक्रम नक्की यशस्वी होईल. याचा फायदा शहरातील प्रदूषण कमी होण्यास होणार असून आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम लाभदायक ठरणारा आहे, असे सांगितले. नो व्हिकल डे हा लोकांचा उपक्रम असून यात लोकसहभाग वाढावा, अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी व्यक्त केली. हा उपक्रम चंद्रपूरकरांचा असल्यामुळे जोपर्यंत चंद्रपूरकर सहभागी होणार नाहीत, तोपर्यंत हा उपक्रम यशस्वी होणार नाही. याला उत्सवी स्वरुप न येता नो व्हिकल डे नागरिकांचा दैनंदिन कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाहतूक सुरक्षा अभियान सुरु होत असून पियूसी नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. पोलीस विभागाच्या वतीने चार ते पाच ठिकाणी पीयूसी सेंटर उघडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नो व्हिकल डे या उपक्रमाचा मुळ उद्देश प्रदूषण कमी करणे, हा असून या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात येतील असे ते म्हणाले. नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर व वापरणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे संकेत दिले. आवडेल ते झाड हा उपक्रम मनपा यावषीर्ही राबविणार असून वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्यासाठी मनपाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त सुशीर शंभरकर यांनी केले. प्रास्ताविक प्रल्हाद गिरी यांनी तर संचालन डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)नागपूरचे व्यावसायिकसायकलपटू सहभागीनागपूर येथून अनिरुध्द रईच, आनंद कस्तुरे व यश शर्मा हे व्यावसायिक सायकलपटू या उपक्रमात सहभागी झाले होते. सायकलचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन रईच यांनी केले. त्याच बरोबर सायकलच्या वापरासंबंधी उपयुक्त अशी माहिती त्यांनी दिली.
वाहनविरहित दुसरा सोमवार उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 00:58 IST