जिल्हाधिकाऱ्यांची भेट : पावसाळ्यापूर्वी काम संपविण्याचे निर्देशचंद्रपूर : दाताळा पुल ते चोराळा पुलापर्यंतचे इरई नदीच्या मुळ पात्रात गाळ साचल्याने शहरात नदीचे पाणी शिरून पुरपरिस्थिती निर्माण होते. यावर उपाययोजना म्हणून पात्रामधील गाळ काढणे व नदीचे पात्र रूंद करण्याचे काम जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत सुरू आहे. या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली.दोन जेसीबी, दोन डोझर व पाच टिप्परव्दारे पात्र रूंद करण्याचे काम सुरु आहे. या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करुन कामाबद्दल समाधान व्यक्त केले. पावसाळा सुरु होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. दाताळा पुलापासून गाळ काढण्याचे काम सुरु केले असून पूलापासून दीड किलोमिटरपर्यंतचा गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. यापुढे चोराळा पुलापर्यंतचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता ईश्वर आत्राम व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर. सोनोने यांनी दिली. उर्वरीत गाळ काढण्याचे काम पावसाळा संपताच सुरु करून २०१६ मध्ये पूर्ण करण्यात येईल, असे सोनोने यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
इरई नदीच्या कामाची पाहणी
By admin | Updated: June 3, 2015 01:37 IST