आष्टी (जि. गडचिरोली) : आष्टी-आलापल्ली मार्गावर असलेल्या चंदनखेडी फाट्याजवळ शनिवारी दुपारी बस व पीकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन पीकअपचा चालक व मिरची ताेडून गावाकडे परत जात असलेले चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील तीन मजूर असे चार जण ठार झाले. १५ मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर आणि गडचिरोली येथे हलविले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातून काही मजूर तेलंगणा राज्यातील विजयवाडा जवळील उटकूट येथे मिरची तोडायला गेले होते. होळीचा सण असल्याने ते तेलंगणातील वाहन भाड्याने करून गावाकडे निघाले होते. चंदनखेडी गावाजवळ भंडाराहून अहेरीकडे येणाऱ्या बसशी या वाहनाची धडक बसली. यात चालकासह एक मजूर जागीच ठार झाला तर दाेन मजूर गडचिराेली रूग्णालयात मृत्यू पावले. वाहनात एकूण १८ मजूर होते. १५ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना चंद्रपूर आणि गडचिरोलीला रेफर करण्यात आले. मृतांमध्ये पीकअप वाहन चालक साईराम रमेशबाबू सूर्यदेवरा (३५) रा. तेलंगणा राज्य, देवाजी खाेकले, नैना निकुरे दाेघेही रा. आवळगाव व अर्चना आवारी रा. हळदा यांचा समावेश आहे.
जेसीबीने दरवाजा ताेडून मृतदेह काढला दाेन वाहनांची धडक एवढी जबर हाेती की पीकअप वाहनाचा चेंदामेंदा झाला. सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी जेसीबी पाठवून पीकअप वाहनाचा दरवाजा ताेडला व चालकाचा मृतदेह बाहेर काढला. बसचालक शरद निवृत्ती काेल्हे (४०) याला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर बस अहेरी आगाराची आहे.