मूल : तालुक्यातील भेजगाव परिसरात चिचाळावरून विद्युत पुरवठा केला जातो. या परिसरात जवळपास २० गावे असून मूलशिवाय कोठेही विद्युत केंद्र नाही. विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे भेजगाव या केंद्रस्थानी असलेल्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीने ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र उभारावे, अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.
ग्रामीण भागात आजच्या घडीला विद्युत पुरवठा आवश्यक बाब ठरली आहे.
हिवाळ्याचे दिवस असले तरी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने जनता त्रस्त झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर हा लपंडाव अधिकच वाढतो. तसेच वीज वितरण कंपनीच्या धोरणामुळे कधी कमी-अधिक दाबाचा वीजपुरवठा होतो. परिणामी घरगुती उपकरणे, कृषिपंप निकामी ठरत असल्याची बोंब ग्रामस्थांमध्ये आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण नागरिकांना रोजगाराचे साधन मिळाले. छोट्या-मोठ्या उद्योगांतून नागरिक उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामध्ये पीठगिरणी, राईस मिल, मेडिकल यांसारख्या उद्योगांत विजेचा वापर होतो. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. मात्र विजेचा लपंडाव व कमी दाबाचा वीजपुरवठा याचा फटका या छोट्या उद्योगांना बसत आहे.
विजेचा वाढता लपंडाव व कमी दाबाचा विद्युत पुरवठा, यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत. या समस्येतून सुटका व्हावी म्हणून भेजगाव येथे विद्युत वितरण कंपनीने ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र उभारावे, अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.