चिमूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ मध्ये निवडणूक कार्यात सेवा देणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिक्षक भारती जिल्हा चंद्रपूर यांनी निवडणूक अधिकारी यांना दिले.
ग्रामपंचायत निवडणुकीत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन रोखीने देण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक यांनी सांगितले होते. पण काही तालुके वगळता जिल्ह्यात कुठेही रोखीने मानधन देण्यात आले नाही. ही बाब लक्षात आणून दिली असता, सर्व तालुक्यांना निवडणुकीकरिता रक्कम उपलब्ध करून देण्यात आली. स्थानिक प्रशासनाने ती रक्कम रोखीने दिली नाही. यासंदर्भात सर्व तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असून, लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना मानधन त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे संबंधितांनी शिक्षक भारती शिष्टमंडळाला सांगितले.
शिष्टमंडळात शिक्षक भारती विभागीय उपाध्यक्ष रवींद्र उरकुडे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे, सरचिटणीस नंदकिशोर शेरकी, संघटक विलास फलके, प्रसिद्धीप्रमुख विजय मिटपल्लीवार, मूल तालुका अध्यक्ष क्रिष्णा बावणे, राबीन करमरकर यांचा समावेश होता.