नागभीड : आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नरत असतो. बनवाही (बिकली) येथील पालकांनाही असेच वाटत आहे. म्हणूनच गेल्या दोन वर्षापासून गावात वर्गखोल्या मिळाव्यात यासाठी ते लढा देत आहेत. पण त्यांच्या या लढ्याकडे लक्ष द्यायला कोणालाही सवड नाही.बनवाही साडेचारशे ते पाचशे लोकवस्तीचे गाव असून शासनाकडून चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी वर्ग जरी चार असले तरी वर्गखोली मात्र एकच आहे. येथे विद्यार्थीसंख्या ३२ असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. चारही वर्गाचे विद्यार्थी एकाच खोलीत बसून शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, ही वर्गखोली मोडकडीस आली असून पावसाने गळत आहे. एकाच खोलीत चारही वर्ग भरत असल्याने व गळत असल्याने शिक्षकांना शिकविण्यास आणि विद्यार्थ्यांना बसण्यास मोठी अडचण होत आहे. गावात वर्गखोली व्हावी यासाठी गावकऱ्यांचा गेल्या दोन वर्षापासून सतत पाठपुरावा सुरू आहे. त्या भागाच्या पं.स. सदस्य, जि.प. सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार या सर्वांना आतापयर्यंत निवेदने देऊन झाली. वस्तुस्थिती सांगून झाली. पण याचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान ३० जून रोजी गावकऱ्यांचे शिष्टमंडळ पुन्हा नागभीड येऊन निवेदन दिली. मागणी मान्य न झाल्यास आता शाळेलाच कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
वर्गखोलीसाठी पालकांचा असाही लढा
By admin | Updated: July 3, 2014 23:31 IST