राज्यात १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणासाठी जिल्ह्यात २६ हजार १४१ कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये एससीडब्ल्यू १७ हजार ३४१, एफएलडब्लू श्रेणीतील ८ हजार ८०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारपर्यंत १६ हजार ३३७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यात ब्रह्मपुरी, भद्रावती, चंद्रपूर जीएमसी, चंद्रपूर ग्रामीण व चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. अन्य तालुक्यातील केंद्रांतील लसीकरणाचा वेग अजूनही वाढला नाही. त्यातही फ्रंटलाइन वर्कर्स मागे असल्याचे अहवालातून पुढे आले आहे. आरोग्य कर्मचारी श्रेणीत मात्र चंद्रपूर जिल्ह्याने आघाडी घेतली. मंगळवार (दि. १६)पर्यंत संपूर्ण राज्यात फक्त चंद्रपूर व पालघर या दोनच जिल्ह्यांत ७२ टक्के लसीकरण झाले.
एफएलडब्लू मागे राहण्याचे कारण काय?
आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी कोरोना लस घेण्यात अगदी सुरुवातीपासूनच पुढे आहेत. आरोग्य क्षेत्रातील नवीन बदलांना तातडीने प्रतिसाद देऊन ते उत्साहाने रुग्णांना सेवा देतात. मात्र, पोलीस व शासनाच्या विविध विभागांतील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांकडून लस घेण्याचा वेग मंदावला. ८ हजार ७०४ पैकी ३ हजार ७३६ जणांनी लस घेतली. ४ हजार ९६८ जण शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांना कशाची धास्ती आहे, याचा शोध घेऊन तातडीने समुपदेशन करण्याची गरज असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले.
९ हजार ९०४ कर्मचाऱ्यांचे डोस शिल्लक
जिल्ह्यातील १७ लसीकरण केंद्रांमध्ये नोंदणी केलेल्या दोनही श्रेणीतील २६ हजार १४१ कर्मचाऱ्यांपैकी सोमवारपर्यंत १६ हजार २३७ जणांनी लस घेतली. ९ हजार ९०४ कर्मचाऱ्यांचे डोस शिल्लक आहेत.