चंद्रपूर : सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे नव्याने बांधलेल्या रस्त्यांची दैना होत आहे. याशिवाय अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आता या जडवाहतुकीवर आळा घालून वाहतूकदारांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक आढळून आल्यास एक रुपया प्रति किलोप्रमाणे तडजोड शुल्क वसूल केले जाणार आहे. याशिवाय जडवाहनांचा परवानाही निलंबित करण्याचा निर्णय आज बुधवारी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. ही कारवाई १ मार्चपासून अंमलात येणार आहे.प्रादेशिक परिवहन विभागाची अधिकारीदेखील उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाच्या डोळ्यात धूळ घालून क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक केली जात आहे. अलिकडे हा प्रकार चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता यासंदर्भात करण्यात येणाऱ्या कारवाईच्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करण्याचा गुन्हा वाहनधारकांकडून घडल्यास पहिल्या गुन्हयात १० दिवस निलंबन, दुसऱ्या गुन्ह्यात ३० दिवस निलंबन व तिसऱ्या गुन्ह्यात ५० दिवस परवाना निलंबित करण्यात येणार आहे. वाहन मालकास आपला परवाना निलंबित करावयाचा नसल्यास विभागीय कारवाई अंतर्गत तडजोड शुल्क एक रुपया प्रति किलोप्रमाणे दंड वसूल करावा किंवा अतिरिक्त माल घेऊन जाताना आढळल्यास त्यावर विभागीय कारवाई करावी, असा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला. सदर निलंबनाची कारवाई १ मार्चपासून लागू करण्यात येईल. सदर बैठकीमध्ये योग्यता प्रमाणपत्र विधिग्राहय नसल्यास विभागीय कार्यवाही अंतर्गत तडजोड शुल्क वसुल करण्यासाठी चर्चा करण्यात आली व मान्यतेसाठी सदर प्रस्ताव सवार्नुमते मंजूर करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)योग्यता प्रमाणपत्रही नियमानुसार हवेवाहनधारकांकडे योग्यता प्रमाणपत्र विधिग्राह्य नसल्यास, ज्या तारखेस योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेली आहे, त्या तारखेपासून योग्यता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी प्रत्येक प्रलंबित महिन्याकरिता एक हजार रुपये या प्रमाणे तडजोड शुल्क वसूल केले जाणार आहे. मात्र हे तडजोड शुल्क दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.
जड वाहतूकदारांच्या आवळणार मुसक्या
By admin | Updated: February 26, 2015 00:43 IST