देशाचे नेतृत्व करणारा भारत घडवू या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:51 PM2017-08-16T23:51:29+5:302017-08-16T23:51:47+5:30
देशाच्या स्वातंत्र्यांच्या ७० व्या वर्धापन दिवसाला स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करताना उत्तम नियोजनाच्या आधारे हा देश अधिक बळकट आणि समृध्द करण्याचा संकल्प केला पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यांच्या ७० व्या वर्धापन दिवसाला स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करताना उत्तम नियोजनाच्या आधारे हा देश अधिक बळकट आणि समृध्द करण्याचा संकल्प केला पाहिजे. देशाने गेल्या ७० वर्षात प्रगतीचा मोठा टप्पा पार केला असून आता जगाचे नेतृत्व करणारा भारत घडविण्याचे दायित्व आपले आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हयातील स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ना. मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्य दिनाचे आयोजन म्हणजे एकीकडे उत्साह आणि अस्मितेचा सोहळा तर दुसरीकडे आत्मचिंतन करण्याची संधी असल्याचे सांगितले. १९४२ मध्ये चले जाव चळवळीनंतर देशाच्या स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त झाला. चले जाव चळवळीने देशाला स्वातंत्र्य दिले. मात्र या चळवळीचे महत्व आजही संपले नसून विषमता चले जाव, आतंकवाद चले जाव, नक्षलवाद चले जाव, भ्रष्टाचार चले जाव, निरक्षरता चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे. यासाठी आपल्या जिल्हयाचे दायित्वही मोठे आहे. कारण या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या खंजेरीतून आणि ‘पत्थर सारे बाम्ब बनेगें, भक्त बनेंगी सेना’ अशा भजनातून चिमूरचा स्वातंत्र लढा उभारणारा हा जिल्हा आहे. चीनच्या युध्दामध्ये मा.सा.कन्नमवार यांच्या आवाहनानंतर सुवर्णदान देणारा हा जिल्हा आहे. युनियन जॅक भारतावर फडकला असताना येथील गोंड राजाने आपले स्वातंत्र अबाधित ठेवले होते. त्यामुळे कायम स्वातंत्र जपणारा आणि परोपकार करणारा हा जिल्हा आहे. या जिल्हयाने बाबा आमटेंच्या नेतृत्वात भारत जोडोचे आवाहन केले होते. याच ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेला दूर करण्यासाठी बौध्द धर्माची दीक्षा दिली. ही आमची परंपरा कायम स्मरणीय आहे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी जिल्हयापुढे मानव विकास निर्देशकांमध्ये पुढे जाण्याचे आवाहन असल्याचे सांगितले. यासाठी आम्हाला उत्तम नियोजनातून प्रयत्न करावे लागतील. समतोल विकासासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यांचा विकास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्या आघाडयांवर आपण मागे आहोत. त्याकडे आगामी काळात लक्ष वेधण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हयात गेल्या तीन वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी मांडला. जिल्हयामध्ये पायाभूत सुविधांचे जाळे उभे राहत आहे. विचार मंथनाशिवाय प्रगती शक्य नसते. त्यासाठी विचार मंथन देणाºया सभागृहांचा जिल्हा म्हणूनही चंद्रपूर पुढे येत आहे. चंद्रपूर येथे प्रियदर्शिनी सभागृह, मूल येथे मा.सा.कन्नमवार स्मारक या पाठोपाठ बल्लारपूर, वरोरा, ब्रम्हपूरी या ठिकाणी देखील भव्य नाटयगृह निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. येणाºया काळात वन अकादमीची भव्य इमारत उभी राहत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. सैनिकी शाळा, बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र, वनस्पती उद्यान सारेच नवीन प्रकल्प भव्यदिव्य होतील. बल्लारपूर येथे पहिली मुलींची डिजीटल शाळा सुरु होणार असून त्यासाठी सात कोटीचा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील सर्वोत्तम प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिल्हा म्हणून चंद्रपूरचे पुढे येत आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून दुग्ध उत्पादनात आम्हाला पुढे जायचे आहे. चिचपल्लीच्या बांबू प्रशिक्षण केंद्रातील झेंडा पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांच्या दिल्लीच्या कार्यालयात पोहचला आहे. चंद्रपूरचे नाव देशाच्या नकाशावर मांडणारे हे प्रकल्प आहेत. यावेळी त्यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे देशात पहिला प्रयोग असणाºया ‘हॅलो चांदा’ या पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राच्या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाºया मान्यवरांचा सत्कार केला. यामध्ये महसूल विभागातील संदीप चांदेकर, सोनाली लांडगे, प्रवीण वरभे, रुपेश चिंवडे यांचा समावेश होता. तर राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ठ काम करणाºया खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. श्रृती हेमंत भगत हिला शालेय रोनबाल क्रीडा स्पर्धेसाठी, प्रणव किशोर चिल्लावार याला शालेय थ्रोबाल क्रीडा स्पर्धेसाठी सन्मानीत करण्यात आले. गोंडकालीन परकोटाच्या सफाईचे काम करणाºया ईकोप्रो या संस्थेच्या बंडू धोत्रे व त्यांच्या सहकाºयांचा सत्कार झाला. प्रधानमंत्री खनीज क्षेत्र कल्याण योजनेतून बालकांच्या हृदय शस्त्रक्रीयेसाठी १० लाखांचा धनादेश जिल्हा शल्य चिकित्सकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शहरातील पोलिसांना गस्त घालण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सायकली मंजूर करण्यात आल्या होत्या. त्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.