पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव परिसरातील कळमना, आमडी, इटोली, दहेली, किन्ही, कवडजाई, बामणी, मानोरा, कोर्ती मक्ता या गावातील शेतकऱ्यांनी कापूस पिकात तसेच एकलग तुरीची लागवड केली आहे. सध्या पीक फुलोऱ्यावर आले आहे. परंतु किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी तुर पिकावर महागडे कीटकनाशकाची फवारणी करून पीक वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे. परंतु ढगाळ वातावरण असल्यास तूर पिकाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.
खडसंगीत पाणी पुरवठा अवेळी
खडसंगी : मागील काही दिवसापासून ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र वेळी- अवेळी नळ सोडण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी सकाळी पाणीपुरवठा केला जात होता. आता कधी सकाळी तर कधी सायंकाळी पाणी सोडले जात आहे. पूर्वी प्रमाणेच पाणीपुरठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गांगलवाडी परिसरात रस्त्यांची दुरवस्था
गांगलवाडी : परिसरातील गांगलवाडी ते मुडझा, गांगलवाडी ते चौगाण, तळोधी या प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पेट्रोल पंपवरील शौचालय कुलूपबंद
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही पेट्रोलपंपवर शौचालय असले तरी त्या शौचालयाला कुलूप लावून ठेवत असल्याने येणाऱ्यांना इतरत्र भटकावे लागत आहे. त्यामुळे शौचालय सर्वांसाठी खुले करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरपना ते नागपूर बस सेवा सुरू करा
कोरपना : येथून राज्याची उपराजधानी नागपूरसाठी एकही बस उपलब्ध नाही. परिणामी प्रवाशांना वणी किंवा राजुरा येथे जाऊन बस पकडावी लागते. सद्यस्थितीत गडचांदूर येथून नागपूरसाठी अनेक बसेस आहेत. त्या कोरपनापर्यंत वाढविण्यात याव्या व कोरपना येथून सकाळी अकरा वाजता व सायंकाळी पाच वाजता बस फेरी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वैद्यकीय कार्यालयाच्या स्थलांतरणाची मागणी
कोरपना : येथील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय गडचांदूर येथे आहे. ते कार्यालय एकाच वेळी सर्व कामे होण्यासाठी तालुका मुख्यालयावर असणे गरजेचे आहे. त्यामुळे अलीकडेच सदर कार्यालय कोरपना येथे स्थानांतरण करण्यात यावे. असा ठराव घेण्यात आला. मात्र त्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही कोरपना येथे कार्यालय स्थलांतर झाले नाही. यामुळे कार्यालय केव्हा स्थलांतर होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
जुने उमरहीरा सोयीसुविधांपासून दूर
कोरपना : तालुक्यात जुने उमरहिरा हे गाव आहे. या गावातील मध्यंतरीच्या काळात लोकांनी स्थलांतर केल्याने सदर गाव ओस पडले आहे. सद्यस्थितीत या गावात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य शिक्षण आदी सुविधाची वानवा आहे.
अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका
नांदा : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या व वाहने वाढली. या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
श्यामनगरील नालीबांधकाम अर्धवट
चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील श्यामनगर व इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, नाल्यांचे बांधकाम अर्धवट आहे. पावसाळ्यातील रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरावे
सावली : सर्वसामान्यांचे गावातच समस्यांंंचे निराकरण व्हावे, हा एकमेव हेतू समोर ठेवून शासनाने गावागावांत पोलीस पाटील पदाची निर्मिती केली. परंतु, तालुक्यातील पोलीस पाटलांचे दहा पदे दोन वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे पोलीस पाटील पद तत्काळ भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.