ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना पुन्हा नक्षलग्रस्ताच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यात नक्षल्यांची पत्रके आढळून आली. नक्षल्यांवर कारवाईदेखील झाली. तरीही हे तालुके नक्षलग्रस्त घोषित केले जात नसल्याने या तालुक्यांवर शासनस्तरावर दुर्लक्ष होत आहे. नव्या यादीत या दोन्ही तालुक्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांची आहे.राज्यातील नक्षलग्रस्त भाग घोषित करण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात आढावा घेतला जातो. या आढाव्यानंतर आवश्यकतेनुसार नक्षलग्रस्त भाग वगळायचा की ठेवायचा हे ठरविले जाते. सन २०१२ मध्ये वडसा रोडवरील आमले बी.एड कॉलेजवळ नक्षली पत्रके रस्त्याने फेकली होती. तसेच नागभीड तालुक्यात तळोधी (बा.) येथे बसस्थानकावरुन पुनवटकर नावाच्या नक्षलवाद्यास पकडले होते. या दोन्ही घटना तालुक्यासाठी मोठ्या असूनही ही दोन्ही तालुके नक्षलग्रस्त घोषित का केली जात नाही, असा प्रश्न नागरिकांसह कर्मचारी करीत आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नक्षली कारवाया अजूनपर्यंत आढळून आल्या नाही. तरी ते तालुके नक्षलग्रस्त म्हणून घोषित झाले होते व पुन्हा हालचाली त्याच तालुक्यांच्या बाबतीत होताना दिसत आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यांवर हा अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. ब्रह्मपुरी तालुका हा आरमोरीला लागून असल्याने नक्षल कारवाया होत असतात. नव्याने तयार होणाऱ्या नक्षलग्रस्तांच्या यादीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यांचा समावेश करावा व यापूर्वी या तालुक्यांवर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी दोन्ही तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
नव्या यादीत ब्रह्मपुरी, नागभीडचाही समावेश करा
By admin | Updated: February 22, 2015 01:03 IST