राजेश भोजेकर लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात हल्लेखोर वाघांना विनापरवानगीनेच पकडण्याचा नवा पायंडा पाडताना वन विभागाचे अधिकारी दिसत आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीविनाच वाघांना पकडल्याची धक्कादायक माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.
दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी पोंभुर्णा उपवनक्षेत्रात एका वाघिणीला वन विभागाने परस्पर बेशुद्ध करून जेरबंद केले. 'लोकमत'ने लक्ष वेधल्यानंतर परवानगीचे सोपस्कार पार पाडल्याची माहिती आहे. १० जानेवारीला नागभीड वनपरिक्षेत्रात एका वाघाने एकाला हल्ला करून ठार केले. दि. १२ जानेवारीला म्हणजे दोन दिवसातच त्या वाघाला जेरबंद करण्यात आले. वाघाला पकडल्यानंतर परवानगीचे प्रयत्न केल्याची माहिती सूत्राने दिली. १४ जानेवारीला बल्लारपूर वनक्षेत्रात एका वनमजुराला वाघाने ठार केले. यानंतर वाघ तिथेच बसून असताना वन विभागाने त्या वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन मारून जेरबंद केले. या वाघाला इतक्या तातडीने पकडण्यासाठी परवानगी दिली होती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मग, 'येडा अण्णा'ला का जीव गमवावा लागला?
- २०१८ मध्ये चिमूर तालुक्यातील जंगलात 'येडा अण्णा' नावाने ओळखला जाणारा वाघ एकाच जागेवर जखमांनी विव्हळत होता.
- त्याच्यावर उपचार करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीची वाट पाहावी लागली. परवानगी येताच येडा अण्णाने उपचारांच्या प्रतीक्षेत जीव गमावला.
- वन विभागाचे धोरण नेमके काय? असा प्रश्न या घटनांनी निर्माण झाला आहे.
वाघाला पकडण्यासाठी अटींचे पालन झाले का? वाघाच्या पूर्व इतिहासाचा तपशील तपासणी सूची मनुष्यहानी, जखमी प्रपत्र पशुहानी, जखमी प्रपत्र कॅमेरा ट्रॅपमधील वाघाचे फोटो गावकऱ्यांचे निवेदन जीआरटी टीम व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या गस्तीचे फोटो मानव-वन्यजीव संघर्ष काळातील उपाययोजना