क्वारन्टाईन लोकांचेच आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:44+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ झाली असून जिल्ह्यातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. जिवती तालुका हा अतिदुर्गम असल्याने येथील नागरिक पुणे -मुंबई येथे आपल्या उदरनिर्वाहासाठी नेहमीच जात असतात. पण यावर्षी कोरोनामुळे जिवती तालुक्यातील ७१ नागरिक पुणे, मुंबई सोडून जिवती तालुक्यात परत आले. चार ते पाच दिवसांपासून आलेल्या या लोकांना शासकीय आश्रमशाळा जिवती येथे क्वारन्टाईन करण्यात आले आहे.
संघरक्षित तावाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यातील कुंभेझरी, दमपूर मोहदा, शेणगाव, धोंडाअर्जुनी, पांढरवणी या खेडेगावातील ७१ नागरिक हे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक येथून आले असून त्यांना जिवती येथील शासकीय आश्रमशाळेत क्वारन्टाईन केले आहे. मात्र त्यांच्याकडे तालुका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या लोकांचेच आरोग्य आता धोक्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ झाली असून जिल्ह्यातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. जिवती तालुका हा अतिदुर्गम असल्याने येथील नागरिक पुणे -मुंबई येथे आपल्या उदरनिर्वाहासाठी नेहमीच जात असतात. पण यावर्षी कोरोनामुळे जिवती तालुक्यातील ७१ नागरिक पुणे, मुंबई सोडून जिवती तालुक्यात परत आले. चार ते पाच दिवसांपासून आलेल्या या लोकांना शासकीय आश्रमशाळा जिवती येथे क्वारन्टाईन करण्यात आले आहे. परंतु कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. कोरोना हा आजार संसर्गजन्य असला तरी आणि आश्रमशाळेत अनेक खोल्या असल्या तरी अनेक व्यक्तींना वेगवेगळे न ठेवता एकत्र ठेवण्यात आले आहे. क्वारन्टाईन ठेवलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून जेवण दिले जायला पाहिजे. परंतु त्यांच्या घरून जेवणाचा डबा आणून दिला जात आहे. यामुळे इतरांचेही आरोग्य बाधित होण्याची भीती आहे. सर्व वस्तू घरून आणि घरातील कुटुंबांशी संपर्क येत असल्याने क्वारन्टाईन करण्याचा हेतूच दूर लोटला जात आहे. तेथील व्यक्तींना सॅनिटायझर, साबू पुरविले जात नाही.
७१ पैकी २८ लोकांची तपासणी
जिवती येथील शासकीय आश्रमशाळेत ७१ नागरिकांना क्वारन्टाईन ठेवण्यात आले असून यापैकी २८ नागरिकांना चंद्रपूर येथे तपासणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी पाठविले. उर्वरित नागरिकांची अजूनही तपासणी करण्यात आलेली नाही. तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांचा अहवाल यायचा आहे.