अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरबल्लारपूर पंचायत समितीत एकूण २८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. यातील एकूण १०४ शिक्षकांपैकी तब्बल ४९ तर जिल्ह्यातील ३ हजार शिक्षकांनी बंगलोर येथील अधिवेशनासाठी वाट धरली. परिणामी शिक्षणांचा खेळखंडोबा निर्माण होऊन गुरुजींनी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याने पालकांत असंतोष पसरला आहे.सार्वजनिक शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था आजघडीला बिकट झाली आहे. दिवसेंदिवस विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. अशातच शालेय शिक्षण विभागाने बंगलोर येथील शिक्षकांच्या अधिवेनशनासाठी जाणाऱ्या शिक्षकांना १४ ते २३ डिसेंबर दरम्यान नैमित्तीक रजा मंजूर केल्याचे ऐकविण्यात येत आहे. मात्र याचे नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे काही शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनाच वाऱ्यावर सोडून गेले आहेत. अशा शाळेत केवळ एकाच शिक्षकाला चार वर्गाचा भार सांभाळण्याची वेळ आली आहे.देशाचे भावी नागरिक घडविणाऱ्या शिक्षकांनी केवळ अधिवेशनाचे निमित्त करुन विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणे उचित नाही. विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शालेय अभ्यासक्रमासह त्यांच्यातील कल्पनाशक्तीला बळ देण्याचे कार्य त्यांनाच पार पाडावे लागते. व्यक्तिमत्वाचा विकास घडविण्यासाठी त्यांचे योगदान मोठे असते. मुलांच्या मनावर विद्यार्जनासह कल्पकता बिंबवण्याचे कार्य शिक्षकच पार पाडतो. असे असले तरी कार्यरत शिक्षकांपैकी अर्धे शिक्षकच रजा घेऊन गेल्याने गुरुजी प्रतीचा आदर कमी होण्याचा प्रकार या निमित्ताने आजघडीला घडला आहे.शालेयस्तरावर शिक्षकांना जनगणना, मतदार यादीचे कामे, बीएलओ तत्वाची कामे दिल्यास विद्यार्थ्यांचे शालेय शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड शिक्षक संघटनाच्या माध्यमातून केली जाते. मात्र अधिवेशनाच्या नावावर शिक्षकांनी घेतलेला निर्णय पटणारा नाही. अधिवेशन आहे त्यावेळी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अवश्य जावे, न्याय मागण्या त्यात कराव्या. परंतु, महिन्यापूर्वी दिवाळीच्या सुट्या संपताच पुन्हा अधिवेशनासाठी एका आठवड्याची रजा घेणे, ही बाब शिक्षण क्षेत्रात योग्य नाही. यामुळेच पालकांत असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षक समाजातील महत्त्वाचा घटक आहे. यामुळेच गुरु परंपरा आजतागायत पाळली जात आहे. समाजाचे आपण देणे लागतो, याची त्यांना जाणीव आहे. याच बांधिलकीतून पालक वर्ग त्यांच्यावर लहान वयात संस्कार करण्याची जबाबदारी सोपवितात. उत्तम विद्यार्थी व नागरिकही बनतील, अशी आशा बाळगतात. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी ग्रामीण भागातीलच आहे. आधिच शिक्षणात तो शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे आहे. असे अताना गुरुजींनी विद्यार्थ्यांपैकी आपुलकी न बाळगता आठवड्याभरासाठी का होईना, रजेवर गेल्याने गुरुजींच्या कार्य शैलीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.
गुरुजींनी विद्यार्थ्यांना सोडले वाऱ्यावर
By admin | Updated: December 18, 2015 01:18 IST