काँग्रेसचा आरोप : सरकारचे आश्वासन फसवे चंद्रपूर : जीवनावश्यक घटक असलेल्या आहारातील तुरीचे भाव गगणाला भीडले आहेत. सरकारला याची कल्पना असूनही केवळ दर कमी करण्याचे पोकळ आश्वासनच दिले जात आहे. ऐन दिवाळीच्या दिवसातही डाळ २०० रूपये किलोच्या भावाने विकली जात असल्याने सरकार दरवाढ रोखण्यात अपयशी ठरली असून सरकारचे आश्वासनही पोकळ निघाल्याची टीका चंद्रपर जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.तुर डाळीचे भाव कमी करण्याचे आश्वासन सरकारने दसऱ्याच्या दरम्यान जनतेला दिले होते. मात्र आजही दर कायमच असल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेला माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, प्रदेश सचिव सुनिता लोढीया, अॅड. विजय मोगरे, प्रदेश अनुसुचित जाती विभागाचे महासचिव संजय रत्नपारखी उपस्थित होते. डाळीच्या दरवाढीच्या पुराव्यादाखल नागरकर यांनी चंद्रपुरातील धान्य बाजारातून खरेदी केलेल्या दोन किलो डाळीच्या पावत्यांसह डाळच सादर केली. ते म्हणाले, आजही जनतेला महाग डाळ विकत घ्यावी लागत आहे. ८० रूपये किलोवर हा दर जायला नको असतानाही नाईलाजाने नागरिकांना खरेदी करावी लागत आहे. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. सरकावरने साठेबाजांवर कावरवाईचा फार्स केला. मात्र जप्तीनंतर ही डाळ त्यांना परत देण्याचे औदार्यही या सरकारने दाखविले, याबद्दल आश्चर्य आहे. यावरून हे सरकार कुणाच्या पाठीशी उभे आहे, याची कल्पना येते. गरिबांना अंत्योदय आणि बीपीएलमध्ये डाळ मिळणे दूरच, साधे धान्यही मिळत नाही. काँग़्रेसच्या काळात बीपीएल, एपीएल घटकातील जनतेला धान्य सहज मिळायचे. सर्वसामान्यांच्या योजना या सरकारने बंद करण्याचा सपाटा चालविल्याने सरकारचे निर्णय चुकीचे ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याचा निषेध करत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. डाळीचे दर न उतरल्यास काँग्रेसकडून आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला. पत्रकार परिषदेला शहर उपाध्यक्ष सुलेमान अली, श्याम राजुरकर, ज्योती कमवेलकर आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
तूर डाळी स्वस्त करण्यात सरकार अपयशी
By admin | Updated: November 13, 2015 01:00 IST