लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शुक्रवारी बाम्हणीत पुराच्या पाण्याने घातलेल्या थैमानाने जवळजवळ ३५० घरे बाधित झाली असून ३९ घरे अंशत: पडली आहेत. या पुराने शेकडो एकर शेतातील धान पिकाची नासाडी झाली आहे. पूर ओसरल्यानंतर घरांचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. घरांचे सर्व्हेक्षण आटोपताच शेतीच्या सर्व्हेक्षणास प्रारंभ होणार असल्याचे तहसिलदार मनोहर चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पूर ओसरल्यानंतर तलाठयांच्या चमुने बाम्हणी गावातील बाधीत घरांचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात या चमुला बाम्हणीतील ३५० घरांना बाधा पोचली असल्याचे आढळून आले. तर ३९ घरे अंशत: पडली असल्याचे दिसून आले. नुकसानीनुसार या आपदग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.घरांसोबतच बाम्हणी परिसरातील शेतीचेही या पुराने मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली होती. यावर हजारो रूपयांचा खर्च या शेतकऱ्यांनी केला होता. मात्र शुक्रवारी बिकली शिवारातील तीन चार तलाव व बंधारे ओव्हरफ्लो झाले. यामुळे हे सर्व पाणी बाम्हणी शिवारात व गावात पसरले. या पाण्यामुळे संपूर्ण बाम्हणी हे गाव पाण्याखाली तर आलेच पण त्याचबरोबर बाम्हणी परिसरातील धानाचे रोवणेही या पाण्याखाली आल्याने वाहून गेले. या नुकसानीचेही सर्व्हेक्षण करण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. प्रशासनाने शेतीच्या झालेल्या नुकसानीची दखल घेतली असून घरांचे सर्व्हेक्षण आटोपताच महसूल विभागाचे कर्मचारी शेतीचेही सर्व्हेक्षण करणार असल्याची माहिती नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.बाम्हणीसोबतच विलम, चिखलपरसोडी, चिकमारा, भिकेश्वर, बालापूर खुर्द, नवखळा, बोथली, जिवनापूर, टेकरी, पेंढरी व तळोधी रा.नि.मंडळातील काही गावांना या अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला असल्याची माहितीही तहसिलदार चव्हाण यांनी यावेळी दिली. सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचा अहवाल शासनाला सादर होईल. त्यानंतर मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
बाम्हणीतील पूर ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST