वरोरा : क्षुल्लक कारणावरुन लाठ्याकाठ्यानी मारहाण झाल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या रामकृष्ण माळवे त्याचा बंधू व इतर साथीदारांना वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.भिसी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोलारी गावात १६ एप्रिल २००८ रोजी सायंकाळी गावातील रहिवासी सदाशिव किसन जांभुळे रात्री लग्नाचे जेवण करण्याकरीता गेले असता, रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास रामकृष्ण माळवे, त्यांचा भाऊ व इतरांनी सदाशिव जांभुळे यांना लाठ्याकाठ्यानी मारहाण केली. त्यात रामकृष्ण माळवे याने सदाशिवच्या डोक्यावर बैलबंडीच्या उभारीने मारहाण केली. त्यामुळे सदाशिव जांभुळे गंभीर जखमी झाले. त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले असता १७ एप्रिल २००८ रोजी मृत्यू झाला. घटनेची तक्रार भिसी दाखल होताच पोलिसांनी रामकृष्ण माळवे व त्याच्या साथीदाराविरुद्ध कलम ३०२, १४३, १४८, १४९ भांदवि नुसार गुन्हा नोंदवून अटक करून दोषारोपत्र वरोरा न्यायालयात दाखल केले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून सत्र न्यायाधीश ई.एन. काझी यांनी आरोपी रामकृष्ण माळवे व इतर सहकाऱ्यांना प्रत्येकी पाच वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड सुनावला आहे. (तालुका प्रतिनिधी)
खुनाच्या आरोपींना पाच वर्षांचा सश्रम कारावास
By admin | Updated: June 26, 2015 01:09 IST