चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाने आता महा़डीबीटी पोर्टवर शेतकरी योजना सुरु केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्ज करण्यापासून तर प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या पाहिजे तसा प्रतिसाद नसून ग्रामीण भागातील शेतकरी सध्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये गुंतले आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ६२९ गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. त्यामुळे या रणधुमाळीत ग्रामीण भागातील शेतकरी सध्या गुंतले असून त्यांना अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे, योजने संदर्भात आजही पाहिजे तशी जनजागृती झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना यासंदर्भात माहितीच नसल्याचे चित्र आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही. आधार लिंक नसल्याने अर्ज भरताना अडचणीही येत आहे. त्यामुळे कंटाळून अनेक शेतकरी अर्ज भरत नसल्याचेही चित्र आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुुरु करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यापासून ते सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर इच्छुक शेतकरी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास त्यांना नोंदणी करता येते.
या योजनांसाठी आता एकच अर्ज
एका क्लिकवर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिचंन योजना, मुख्यमंत्री कृषी शाश्वत कृषी सिंचन योजना, अन्न सुरक्षा अभियान, बिरडा मुंडा कृषी क्रांती योजना, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आदी योजनांचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांना पसंतीनुसार निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
अशी करावी लागते नोंदणी
शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आधाड कार्डशी संलग्न करून महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल अथवा संगणकाद्वारे सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी आवाहन
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका क्लिकवर अनेक योजनांचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
---
असे जोडावे लागणार कागदपत्रे
३१ डिसेंबर ही नोंदणी करण्याची अखेरची मुदत आहे. त्यानंतर योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबारा, आठ अ, खरेदी करावयाच्या कृषी अवजाराचे कोटेशन, मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, जातीचा दाखला, स्वयंघोषणापत्र, पूर्व संमतीपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
---
कोट
शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. परंतु यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज कसा करावा यासाठी शेतकऱ्यांना माहिती नाही. केंद्रावर जावून अर्ज करण्यासाठी पैसा लागत असून शेतीकाम सोडून आणि पैसा खर्च करून अर्ज भरावा लागत आहे.
-पवन वाघमारे
शेतकरी, चंद्रपूर
--